टीम लय भारी
कर्जत – जामखेड : पत्राशेड जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यासाठी काल ईडी थेट शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी पोहोचली. ईडीकारवाईच्या या घडामोडी राज्यात काल संपुर्ण दिवस चर्चेत राहिल्या. या कारवाईचा निषेध व्यक्त करत शिवसेनेने सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले, तर भाजप आणि शिंदे गटासाठी कालचा दिवस आनंदाचा ठरला. यावेळी इडीकारवाईवर अनेक जण काल सोशलमिडीयावर व्यक्त झाले, त्यामुळे दिवसभर सोशलमीडिया दणाणत राहिले. दरम्यान यावेळी रोहित पवार यांनी केलेली ‘राजकारण सोडावे वाटतेय’ अशा आशयाची पोस्ट आता चांगलीच चर्चेचा विषय ठरू लागली आहे.
राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनी दिवसभरातील घडामोडीनंतर उद्वीगतेने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. रोहित पवार ट्विटमध्ये लिहितात, आज दिवसभरातील राजकीय घडामोडी बघून आठवड्याभरापूर्वी मा. गडकरी साहेबांनी राजकारण सोडण्यासंदर्भात जी भावना बोलून दाखवली होती, तशीच भावना आज माझीही झालीय. परंतु अशी परिस्थिती बदलण्याची ताकद युवांमध्ये असल्याने त्यांच्याकडं पाहून बळ मिळतं! असे म्हणून त्यांनी सद्यस्थितील राजकारणावर भाष्य करत दुःख व्यक्त केले आहे.
आज दिवसभरातील राजकीय घडामोडी बघून आठवड्याभरापूर्वी मा. गडकरी साहेबांनी राजकारण सोडण्यासंदर्भात जी भावना बोलून दाखवली होती, तशीच भावना आज माझीही झालीय. परंतु अशी परिस्थिती बदलण्याची ताकद युवांमध्ये असल्याने त्यांच्याकडं पाहून बळ मिळतं!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 31, 2022
कायम युवा नेतृत्वाला प्राधान्य देणारे रोहित पवार यावेळी सुद्धा सद्यस्थिती केवळ युवा बदलू शकते असे यावेळी ठामपणे म्हणाले आहेत. सध्या चाललेल्या राजकीय अराजकतेच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. याआधी सुद्धा देशाचे संविधान वाचवायचे असेल तर देशातील युवांनी पुढे यायला पाहिजे कारण याला युवाच तारू शकतो असे म्हणून त्यांनी युवा नेतृत्वाचे महत्त्व विषद केले होते.
दरम्यान रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नितीन गडकरी यांच्या राजकारण सोडण्याबद्दलच्या भावनेचा उल्लेख केला आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले भाषण चांगलेच वादळी ठरले होते. यावेळी गडकरी म्हणाले होते की , जुन्या काळात महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झालं ते पाॅलिटिक्स होतं. ते राष्ट्रकारण, समाजकारण, विकासकारण होतं..आणि आता जे आपण बघतो ते केवळ 100 टक्के सत्ताकारण असे म्हणून त्यांनी त्यावेळी राजकारण सोडावं अशी भावना येत असल्याचे ते म्हणाले होते.
याचाच संदर्भ घेत नितीन गडकरी यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवत रोहित पवारांनी सुद्धा दिवसभरातील राजकीय घडामोडी पाहून राजकारण सोडावसं वाटतंय अशा आशयाची पोस्ट सोशल मिडीयावर टाकली आहे. त्यामुळे राज्यातील, देशातील या सत्ताकारणावर पुन्हा पुन्हा उमटणाऱ्या या प्रश्नचिन्हावर आता रोहित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे युवाशक्तीचं उत्तर ठरू शकेल हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
हे सुद्धा वाचा…
मुंबईला श्रीमंत करणारा मराठी माणूस
उद्धव ठाकरे घुसले एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात, ठाणेकरांकडून जबरदस्त प्रतिसाद