निवडणूक आयोगाने ठाकरे गटाकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्य-बाण हे पक्ष चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यामागे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा खळबळजनक दावा केला होता. या व्यवहारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील सामील असल्याचे त्यांनी म्हंटले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी या आरोपाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे सूचित केले होते. मात्र, त्यानंतरही संजय राऊत आपल्या मतावर ठाम राहिले. या घोडेबाजारासाठी (Horse Trading) तब्बल २००० कोटींचा व्यवहार झाल्याचे राऊत म्हणाले होते. त्याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी आता ठाकरे गटातील नगरसेवक, आमदार, खासदार, शाखाप्रमुख यांना सत्ताधाऱ्यांच्या गोटात खेचण्यासाठी ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आल्याचा नवीन आरोप केला आहे. यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (sanjay Raut published Rate Card of Ruling Party)
उद्धव ठाकरे गटातील लोकप्रतिनिधींची तसेच पदाधिकाऱ्यांची खरेदी करण्यासाठी ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटातील लोकप्रतिनधींना शिंदे-फडणवीस यांच्या गोटात सामिल करून घेण्यासाठी त्यांचे दर आखून देण्यात आले होते, अशी टीका राऊत यांनी केली आहे. ते म्हणाले, ” या देशात यापूर्वी राज्यात कधी ‘रेट कार्ड’ तयार झाले नव्हते. सत्ताधाऱ्यांनी ‘रेट कार्ड’ तयार केले होते. नगरसेवकासाठी २ कोटी, आमदारासाठी ५० कोटी, खासदार ७५ कोटी, शाखाप्रमुखासाठी ५० लाख असं हे रेटकार्ड आहे. यासाठी एजंटही नेमण्यात आले होते. लोकप्रतिनिधींना तसेच पदाधिकाऱ्यांना तोडण्यासाठी ते कमिशनवर काम करत आहेत. हे या देशात पहिल्यांदाच होत आहे. आता कुठंय ईडी, इन्कम टॅक्स?.” सत्ताधाऱ्यांकडे अशी कोणती विचारसरणी ज्यासाठी ते सर्व सोडून जात आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय हा ‘मर्जीवाल्यांसाठी’
संजय राऊत यांनी मंगलकारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “निवडणूक आयोगाचा निर्णय एकतर्फी आणि ‘मेरी मर्जी’वाल्यांच्या मर्जीसाठी दिलेला निर्णय आहे. दडपशाही, दबाव, पैसा, सत्ता या सर्वाचा वापर करून त्यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्य-बाण चिन्ह मिळवलं आहे. गेल्या पाच महिन्यांत दोन हजार कोटींचं पॅकेज खर्च करण्यात आले.” आपण जो आरोप केला आहे त्याच्या परिणामांची पूर्ण कल्पना असल्याचे यावेळी संजय राऊत म्हणाले.
खवळलेल्या शिवसैनिकांचा ताबा कसा घ्याल?
उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हे नाव पक्षचिन्ह काढून घेतल्यानंतर आता विधानभवनात शिवसेना कार्यालयाचा ताबादेखील शिंदे गटाने घेतला आहे. यावर राऊत यांनी खोचक सवाल विचारला आहे. ते म्हणाले, “तुम्ही आमच्या कार्यालयांचा ताबा घ्याल. पण खवळून उठलेल्या लाखो शिवसैनिकांचा ताबा कसा घ्याल? त्यांना कसे शांत कराल? शिवसेना महाराष्ट्राचा आत्मा आहे, मराठी माणसाचा आवाज आहे. शिवसेनेला संपविण्यासाठी दिल्लीश्वराने मागील ६० वर्षांपासून प्रयत्न केले. पण ते आम्ही हाणून पाडले. आता काही लोकांना शिवसेना संपविण्याच्या प्रयत्नात काही अंशी यश आलं असलं, तरी महाराष्ट्रातील जनता पेटून उठली आहे.”
हे सुद्धा वाचा
ठाकरे गटाला आणखी एक धक्का; शिवसेनेचे ट्विटर अकाऊंट, अधिकृत वेबसाईटला लागले ग्रहण!
आताच जागे व्हा, अन्यथा २०२४ नंतर हुकूमशाहीचा नंगानाच सुरु होईल !
२००० कोटींनी न्याय विकत घेतला ; देवेंद्र फडणवीसही व्यवहारात सामील