टीम लय भारी
भिवंडी : शिवसेना पक्षामध्ये भूकंप घडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्यभर निष्ठा यात्रा (Nishta Yatra) घेण्यास सुरुवात केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिवसेना (Shiv Sena) पक्षाची बांधणी करण्याचे काम आदित्य ठाकरे यांच्याकडून केले जात आहे. गुरुवारी (दि. २१ जुलै २०२२) आदित्य ठाकरे यांनी सकाळी भिवंडी मध्ये निष्ठा यात्रा घेतली. पण या निष्ठा यात्रेच्या काही तासांतच शिवसेनेला भिवंडीमध्ये एक मोठा धक्का मिळाला आहे.
आदित्य ठाकरेंच्या भिवंडीतील निष्ठा यात्रेनंतर काही तासांतच शिवसेनेच्या ७ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आणि त्यांना आपला पाठिंबा दिला. भिवंडीतील तब्बल ३३ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भिवंडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच काँग्रेस पक्षाला देखील मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या २६ नगरसेवकांनी सुद्धा आता एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.
सकाळी झालेल्या निष्ठा यात्रेनंतर भिवंडीत घडलेल्या या राजकीय घटनेमुळे आदित्य ठाकरे यांना ट्रोल केले जात आहे. याआधीच ठाण्याच्या बऱ्याच नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, भिवंडीच्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर याबाबतची माहिती स्वतः एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटरवरून दिली.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिका तसेच ठाणे ग्रामीण विभागातील शिवसेना नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला जाहीर पाठींबा दर्शविला.#realshivsena pic.twitter.com/kIjMETN4yO
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 21, 2022
भिवंडीतील नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिल्यानंतर शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. दर दिवशी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एकनाथ शिंदे यांना देण्यात येणाऱ्या पाठिंब्याने शिवसेना पक्षाला भगदाड पडत चालले आहे. आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेने पदाधिकाऱ्यांकडून शपथ पत्र सुद्धा लिहून घेतले. पण या शपथ पत्रात लिहून दिलेल्या वचननाम्याला एकनिष्ठ न राहता पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणे पसंत केले आहे.
हे सुद्धा वाचा :
सणांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
आरेतील मेट्रोशेडवरील बंदी मुख्यमंत्र्यांनी हटवली, आंदोलने आणखी आक्रमक होणार?