टीम लय भारी
पाटणा : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील ईडी कारवाईनंतर राज्यातील राजकारणाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. भाजप आणि शिंदे गोटात आनंदाचे वातावरण आहे तर सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी शिवसेना चांगलीच भडकली आहे. या संपुर्ण पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांनी शिवसेनेसंदर्भात केलेले वक्तव्य आता चांगलेच वादग्रस्त ठरत आहे. भाजपशी मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत होत असून, देशात फक्त भाजपच राहील, बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील, असा दावाच त्यांनी यावेळी केला आहे. त्यांच्या या मोठ्या विधानामुळे विरोधी गटात चांगलीच खळबळ उडाली आहे.
बिहार येथील 16 जिल्ह्यातील भाजप कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर मोठे विधान करीत केवळ भाजप पक्ष देशात अस्तित्व टिकवून राहिल असे म्हणून त्यांनी विरोधकांनी डिवचले आहे. यावेळी बोलताना नवीन बाबूंचा पक्ष हा ओडिशातील वन मॅन पार्टी असून, महाराष्ट्रात आता नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली शिवसेनाही एक कौटुंबिक पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस हा भाऊ-बहिणींचा पक्ष झाला असून, लढा बांधिलकीतून असतो, बांधिलकीतून ताकद जन्माला येते. भाजप हा सर्वसामान्य जनतेशी जोडलेला पक्ष आहे असे म्हणून त्यांनी भाजपचे महत्त्व विशद केले.
पुढे जे पी नड्डा म्हणाले, भाजप कार्यालय हे कार्यकर्त्यांचे पॉवर हाऊस आहे. इथून करोडो कार्यकर्ते जन्माला येतील. भाजप हा विकासाचा समानार्थी शब्द आहे असे म्हणून काॅग्रेसला चिडवत आता तर देशातील अनेक राज्यांतूनही संपुष्टात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजपच्या वाढत्या लोकप्रियतेचा दावा करून ते म्हणाले, आता देशात एक राष्ट्र एक कायदा आहे. भाजप आपल्या कार्यकर्त्यांना मूल्य शिकवते. आम्ही वैचारिक पार्श्वभूमी घेऊन उभे आहोत. आज दोन-तीन दशके इतर पक्षात राहिलेले अनेक लोक पक्ष सोडून भाजपमध्ये येत आहेत. काम करताना देश बदलण्याची ताकद असेल तर ती भाजपमध्येच आहे, हे या सर्वांना समजले आहे असे म्हणून भाजपच देशाचे भविष्य असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले आहे.
हे सुद्धा वाचा…
नितीन गडकरींप्रमाणे रोहित पवारांनाही वाटतेय ‘राजकारण सोडावे’
मुंबईला श्रीमंत करणारा मराठी माणूस
कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी डाॅ. अपुर्वा पालकर यांची नियुक्ती