शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. अनेक आमदार, खासदार, नगरसेवक यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी दर्शवत शिंदे गटात सामील होणे पसंत केले. केवळ नेतेच नव्हे तर सामान्य शिवसैनिकाला सुद्धा एकनाथ शिंदे त्यांना त्यांचे नेते वाटू लागल्याने शिवसेना नेमकी कोणाची असा प्रश्न उद्भवू लागला. दरम्यान शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करीत शिवसेनेवर हक्क सांगायला सुरवात केली आणि प्रकरण थेट कोर्टात पोहोचले. बाळासाहेबांचे नाव वापरून सुरू असणाऱ्या या राजकारणाच्या रंगात कोणाचा रंग फिका पडणार हे आज बहुदा स्पष्ट होणार आहे. सर्वार्थाने गाजलेल्या राज्यातील या सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयात आज काय फैसला होणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
तारीख पे तारीख नंतर आज सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाच्या मुद्यावर सुनावणी होणार आहे. दुपारी 12.30 वाजता या सुनावणीस सुरूवात होणार असून शिवसेना नेमकी कोणाची याबाबत आज उत्तर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक कारणांमुळे सदर सुनावणी लांबणीवर पडत असल्यामुळे सत्तासंघर्षाचा पेच आणखीच वाढत चालला आहे. दरम्यान कालच ही सुनावणी पार पडणार होती परंतु तीन न्यायमुर्तींपैकी एक न्यायमुर्ती गैरहजर असल्याने सुनावणी आजवर ढकलण्यात आली. आज सुद्धा सुनावणी होणार की नाही याबाबत साशंकता होतीच परंतु सत्तासंघर्षाच्या या प्रकरणाला प्राधान्य देत न्यायमुर्ती सुनावणीसाठी तयार झाले.
हे सुद्धा वाचा…
Rahul Dravid Tests Positive : राहुल द्रविडला कोरोनाची लागण, भारतीय संघापुढे वाढले आव्हान
Dahi Handi 2022 : मुंबईतील गोविंदाच्या मृत्यूनंतर सरकारने दहिहंडीबाबत घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न
ST Bus : संतप्त प्रकार, महामार्गावर अंधारात लाईटविना धावली एसटी बस
महाराष्ट्रातील या अभुतपूर्व सत्तासंघर्षात शिवसेनेचा चांगलाच कस लागणार आहे. या लढाईत शिवसेनेला यश मिळाले तर पुढे महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल दिसून येतील, आणि सगळी सूत्रेच बदलतील. परंतु जर शिंदे गट यात यशस्वी झालेच तर शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न कायम राहिल शिवाय शिवसेना आणि शिंदेसेनेतील वाद आणखी प्रखर होईल. याआधी 12 ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी न्यायालयाने 10 दिवस लांबणीवर टाकली. त्यानंतर ही सुनावणी 22 ऑगस्ट रोजी होईल अशी अपेक्षा होती, परंतु त्रिसदस्यीय खंडपीठामधील एक न्यायामूर्ती उपस्थित नसल्याने ही सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.