महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मंगळवारी (ता. 15 ऑक्टोबर) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे हे काही दिवसांपासून नाराज असलेले आमदार सुहास कांदे यांचे मन वळवतील, असे मानले जात होते. मात्र, एकनाथ शिंदे गटातील आमदारांमधील वाढती नाराजी काही कमी होताना दिसत नाही. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकला पोहोचण्यापूर्वीच नाराज सुहास कांदे त्यांच्या नांदगाव मतदारसंघाकडे रवाना झाले होते. नंतर माहिती मिळाली की ते त्यांच्या नांदगाव मतदारसंघातही पोहोचले नाहीत. अशा स्थितीत सुहास कांदे गेले कुठे ? अशी चर्चा रंगली. परंतु यानंतर सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळावर पोहोचले तेव्हा सुहास कांदे त्यांच्या स्वागतासाठी पोहोचले होते. मात्र, त्याठिकाणी सुहास कांदे आणि मंत्री दादा भुसे यांच्यातील अंतर चर्चेचा विषय बनला.
काही दिवसांपूर्वी सुहास कांदे यांनी पत्रकार परिषदेत आपण नाराज नसल्याचे सांगितले होते. संपूर्ण पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पक्षाच्या बैठकांना निमंत्रित करण्यात आले नसल्याचे कांदे यांच्याकडून त्यावेळी सांगण्यात आले होते. नाशिक शहरात शिंदे गटाची कार्यकारिणी तयार झाली आहे. पदाधिकारी निवडले जातात पण याबाबतची माहिती देखील दिली जात नाही, असे सुहास कांदे यांच्याकडून देण्यात आली होती.
सुहास कांदे होते ठाकरे गटातली पहिले बंडखोर
सुहास कांदे हे नाशिक जिल्ह्यातील पहिले आमदार होते, जे उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलले होते आणि त्यानंतर त्यांनी सरळ ठाकरे गटाविरोधात बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे यांना बंडाच्या काळात सर्वाधिक पाठिंब्याची गरज होती. तेव्हा सुहास कांदे हे ठाकरे गटातील पहिले आमदार होते जे शिंदे यांच्या समर्थनात उभे राहिले होते. कांदे यांच्यानंतर विद्यमान मंत्री दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसे यांनी ठाकरे गटाशी बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झाले होते. असे असतानाही कांदे यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही. सुहास कांदे यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात स्थान हवे होते, अशीही चर्चा नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात आहे. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, तर किमान महामंडळाची जबाबदारी तरी द्यायला हवी होती.
हे सुद्धा वाचा
Sushma Andhare : सुषमा अंधारेंनी सांगितले कधी कोसळणार शिंदे-फडणवीस सरकार!
Ajit Pawar : अब्दुल सत्तारांना विनाश काले विपरीत बुध्दी; अजित पवारांनी थेट घेतला खरपूस समाचार
Shiv Sena Split : दिल्ली उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळली
सुहास कांदे नाराज का?
सुहास कांदे यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली होती. जिल्ह्यात होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत मला बोलावले जात नाही, असे ते म्हणाले होते. शहरात पक्षाची नवीन कार्यालये सुरू झाली असली तरी मला त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. शहरात पक्षांतर्गत नव्या नियुक्त्या करण्यात आल्या, त्याबाबत सुहास कांदे यांना अजिबात विश्वासात घेतले गेले नाही. भविष्यात एकनाथ शिंदे गटाला नगरसेवक, आमदार, खासदार अशा निवडणुका जिंकायच्या असतील, तर पक्षामध्ये एकजूट असणे आणि मतभेद नसणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.