शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यात पहिलेच पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. अधिवेशन सुरू झाल्यानंतर सभागृहातील प्रत्येकच दिवस वेगवेगळ्या मुद्यावरून गाजत असताना आजच्या पाचव्या दिवशी मात्र विधान भवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडल्याचे दिसून आले. या जोरदार राड्यानंतर याचे पडसाद राज्यापासून केंद्रापर्यत अगदी सर्वच स्तरातून उमटले. राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या घटनेचा निषेध व्यक्त करीत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटच्या माध्यमातून याबाबत तक्रार केली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे वर्तन सत्ताधारी आमदारांनी केले असून महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्यादृष्टीने तुम्ही तातडीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी, असे सुळे यांनी शहांना सुचवले आहे.
विधान भवन परिसरात घडलेल्या राड्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी थेट अमित शाह यांच्याकडे तक्रारीचा सूर आळवला आहे. सुळे यांनी अमित शाह यांना उद्देशून ट्विट करीत घडलेल्या प्रकरणावर लक्ष घालण्यासंबंधी सुद्धा सुचवले आहे. ट्विटमध्ये सुप्रिया सुळे लिहितात, गृहमंत्री अमित शहा जी, शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात माविआच्या आमदारांबद्दल हिंसक विधाने करून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत असे म्हणून सुळे यांनी याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
गृहमंत्री अमित शाह जी, शिंदे गुट के विधायक महाराष्ट्र विधानभवन परिसर में सरेआम मविआ विधायकों के बारे में हिंसक वक्तव्य कर के उन्हें धमकाने का काम कर रहे है।@AmitShah @Dev_Fadnavis pic.twitter.com/YCCpkV7to3
— Supriya Sule (@supriya_sule) August 24, 2022
हे सुद्धा वाचा…
‘पन्नास खोके एकदम ओके’ या घोषणा विरोधकांना झोंबल्या- अजित पवार
MPSC Result : गरीबीवर मात करत मुलगी बनली ‘क्लास वन’ ऑफिसर
Terrorism: पुण्यात एटीएसने एका दहशवाद्याच्या मुसक्या आवळल्या
पुढे सुप्रिया सुळे म्हणतात, आमदारांकडून माविआ आमदारांच्या सुरक्षिततेचा वाढता धोका पाहून तुमच्या भाजप पक्षासोबत युतीचे सरकार चालवणाऱ्या लोकांच्या या वृत्तीवर कारवाई करावी आणि मविआ आमदारांना झेड प्लस सुरक्षा द्यावी ही आमची विनंती आहे, असे म्हणून सुळे यांनी आमदारांच्या सुरक्षिततेचाच प्रश्न उपस्थित केला आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीशी असभ्य वर्तन सत्ताधाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करून परिस्थिती पाहता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा व लोकशाही मूल्ये शिकवा असे म्हणून सुप्रिया सुळे यांनी शहा यांना सांगून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. सुप्रिया सुळे यांनी थेट अमित शाह यांना या प्रकरणी तक्रार केल्यामुळे आता अमित शाह आणि भाजपच्या गोटातून यावर काय उत्तर मिळणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या या राड्यातील दोषी आमदारांवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत शिंदे गटाकडून अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांचे नाव नमुद केले आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्ष यावर नेमका कोणता निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.