टीम लय भारी
मुंबई : एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील बहुतांशी आमदारांनी एकत्र येत शिवसेनेविरोधात बंड पुकारले आणि भाजपसोबत येत नव्याने सत्ता स्थापन केली. दरम्यान शिवसेनेतील मोठा गटच बाहेर पडल्याने आम्हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येऊ लागला. दरम्यान एकनाथ शिंदे यांना पाठींबा दर्शवत त्यांच्या शिवसेनेचा व्हीप इतर आमदारांनी मोडला म्हणून त्यांच्या कारवाईसाठी शिवसेनेने याचिका दाखल केली आहे.
बंडानंतर पक्ष हक्कापासून ते इतर वेगवेगळ्या कारणांसाठी दाखल केलेल्या सर्व याचिकांवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंडपीठापुढे ही महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे.
खंडपीठाच्या या निर्णयावर राज्यातील सरकारचे अस्तित्व अवलंबून असणार आहे, त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या सुनावणीनंतरच राज्यातील राजकीय घडामोडींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्यपालांनी शिंदेगटाला सत्ता स्थापनेसाठी दिलेली परवानगी, आमदारांनी मोडलेला व्हिप, पक्षाच्या नावावर सांगितलेला हक्क, विधानसभा अध्यक्षांची निवड, बहुमत या सगळ्याच बाबतीत शिवसेनेने शिंदे गटाविरोधात याचिका दाखल केली आहे.
याबाबत सुप्रीम कोर्ट मध्ये सुनावणी घेण्यात आली होती, परंतु कोर्टने याचिकांवर सुनावणीसाठी तीन सदस्यीय खंडपीठ नियुक्त करून यासंदर्भातील याचिकांची सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशाप्रमाणे आज या खंडपीठामध्ये सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हीमा कोहली यांच्या समोर ही सुनावणी पार पडणार आहे.
या संपुर्ण पार्श्वभूमीवर खंडपीठ काय निर्णय घेणार, आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का हे पाहण आता महत्त्वाचे ठरणार आहे.
हे सुद्धा वाचा…
काळजी घ्या! कोरोनानंतर वाढले आता ‘स्वाईन फ्लु’चे संकट
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ‘रविकांत वरपे’ यांनी दिले ‘रामदास कदमां’ना सडेतोड उत्तर