राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. राज्यापालांना पदमुक्त करा, अशी मागणी अनेकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी (28 नोव्हेंबर) खासदार उदयराजे भोसले यांनीही पत्रकार परिषद राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्यावरून सर्वच राजकीय नेत्यांना खडे बोल सुनावले. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उदयराजे भावूक झाल्याचेही बघायला मिळाले.
“राज्यापालांच्या विधानानंतर आज राज्यभरातून आलेल्या विविध संघटनांशी आम्ही चर्चा केली. सर्वांनी राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला. मात्र, एक विचार सतत मनात येतो. ज्या शिवरायांनी सर्वधर्म समभाव हा विचार दिला, आज त्यांचा सर्वपक्षीय नेते केवळ स्वार्थासाठी वापर करतात. प्रत्येक कार्यक्रमात त्यांचे फोटो लावतात, त्यांना अभिवादन केले जाते. मात्र, जेव्हा लिखान असेल किंवा विधान आणि चित्रपटांच्या माध्यमातून शिवरायांचा अवमान केला जातो, तेव्हा तुम्हाला राग का येत नाही? मुळात या विषयावर आता जनतेने विचार करण्याची गरज आहे”, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली दिली.
हे सुद्धा वाचा
लव्ह जिहादच्या विरोधात नाशकात मोर्चा; ऋषी-मुनींसह हजारो लोक सहभागी
औषधोपचारांचा खर्च दिला नाही म्हणून नवविवाहितेची हत्या केली; लातूरमधील धक्कादायक प्रकार उघड
संजय राऊत म्हणाले… ग्रेट, राजभवनची खिंड पडली!
“परदेशातून लोक येतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचं नाव त्यांच्या कानावर पडतं. पण शिवाजी महाराजांचा असा अपमान आपल्याला सहन करायचा असेल तर मोठ्या-मोठ्या स्थळांना, ठिकाणांना त्यांचं नाव देण्याची गरज काय? हे बेगडी प्रेम कशासाठी?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ उदयनराजे भोसले यांनी याआधीही आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांचा निषेध केला. ते म्हणाले, “त्याकाळात शिवाजी महाराजांनी समाजाचा विचार केला. आज सर्व व्यक्तिकेंद्रीत झाले आहेत. कोणीच अपवाद नाही. राष्ट्रीय पक्ष असो की प्रादेशिक पक्ष. असंच चालत राहीलं तर कितपत चालणार. या देशाचे तुकडे व्हायला किती वेळ लागणार?”
“भारत महासत्तेकडे गेला पाहिजे असं आपण म्हणतो. पण हे असंच राहिलं तर देशाचे छोटे छोटे तुकडे होतील. हे देशाच्या अखंडतेला घातक आहे. या लोकांना कधी कळणार. ही नाटकं तरी करता. नका ठेवू शिवाजी महाराजांचा फोटो. त्यांचं नावच पुसून टाकू ना. विमानतळाला तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव देता. देश परदेशातून लोक येतात तेव्हा त्यांच्या कानावर शिवाजी महाराजांचं नाव पडतं. कशाला पाहिजे, जाऊ द्याना कशाला हवं बेगडी प्रेम. रेल्वे टर्मिनसला तरी का नाव द्यायचं. शिवजयंती तरी का साजरी करायची?” हे बोलताना उदयनराजेंना अश्रू अनावर झाले. “मेलो असतो तर बरं झालं असतं. अशा व्यक्तीविरोधात कारवाई करत नसाल तर कुणालाही शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. मीही वेडंवाकडं वागलो तर मलाही नाव घ्यायचा अधिकार नाही”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.