33 C
Mumbai
Tuesday, March 19, 2024
HomeराजकीयMaharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही वेळी फटाके वाजणार? शिंदे गटाचे आमदार...

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही वेळी फटाके वाजणार? शिंदे गटाचे आमदार नाराज?

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या रोखठोक सदरात शिंदे यांच्या गटातील तब्बल 22 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वार्तुळात चर्चांचे पेव फुटले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून मोठ्या उलथापालथी घडत आहेत. 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ते गेल्या तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ऐतिहासिक बंडामुळे कोसळले आणि भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. शिवसेनेचे जवळपास 40 आमदार एकनाथ शिंदे यांनी आपल्या गळाला लावले. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. मंत्रीमंडळ स्थापनेनंतर शिंदे गटातील अनेक आमदारांनी तर मौनव्रत धारण केलेले आहे. आमदारांमधील ही शांतता मात्र आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वादळ घेऊन येते की काय अशा चर्चा देखील सुरू आहेत. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या रोखठोक सदरात शिंदे यांच्या गटातील तब्बल 22 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वार्तुळात चर्चांचे पेव फुटले आहे.

रोखठोकमधून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना म्हटले आहे की, मुख्यमंत्री शिंदे ही तात्पुरती व्यवस्था आहे. दिल्लीत देखील शिंदे यांचा प्रभाव दिसत नाही. सर्वत्र देवेंद्र फडणवीसच दिसत आहेत. भाजपच्या मेहरबानीवरच शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद टिकून आहे. शिंदे गटाचे 40 आमदारच सरकार चालवत असून, आमदारांच्या हट्टापुढे मुख्यमंत्री हतबल असल्याचे एका भाजपच्या नेत्याने सांगितल्याचे या सदरात म्हटले आहे.

सरकारचे सर्व निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर करतात. दिल्लीत देखील आता फडणवीस एकटेच जातात, भाजपने शिंदे आणि त्यांच्या गटातील काही आमदारांनाा ‘ईडी’च्या फासातून तुर्त वाचवले, मात्र त्यांना कायमचे गुलाम करून ठेवल्याचे देखील म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन

BEST Bus Workers Strike : बेस्ट बस कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारला संप

Gopinath Munde : गोपीनाथ मुंडे १९९९ मध्ये मुख्यमंत्री होणार होते, पण शिवसेनेने…

शिंदे यांना देखील आज ना ऊद्या भाजपमध्येच विलीन व्हावे लागेल, त्यानंतर ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील. मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात शिंदे यांचे योगदान दिसत नाही. धारावी पुनर्विकासाच्या प्रकल्पात देखील फडणवीसांचे श्रेय आहे. यामध्ये देखील शिंदे कुठे दिसत नसल्याचे रोखठोकमध्ये म्हटले आहे.

सध्या शिंदे गटाचे २२ आमदार नाराज आहेत. त्यातील बहुसंख्य आमदार स्वत:ला भाजपात विलीन करुन घेतील. त्यानंतर शिंदे यांचे काय होईल असे एका शिंदे गटाच्याच नेत्याला विचारले असता त्यांचा रामदास आठवले होईल, अशी प्रतिक्रीया दिल्याचे सामनाच्या रोखठोक सदरात म्हटले आहे. वर्षातून एकदाच दिवाळी येते, पण राजकारणात कोणत्याही वेळेला फटाके फुटू शकतात, असे रोखठोकमध्ये म्हटले आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी