टीम लय भारी
मुंबई : कोरोनाच्या लाटेनंतर तब्बल दोन वर्षांनी राज्यात सगळीकडे शाळा सुरु झाल्या आहेत. मुलांना शाळेत जाण्याची उत्सुकता आहे. परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे मुलांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत ‘दप्तर‘च मिळाले नाही. या दप्तर दिरंगाईचे उत्तर द्यावे, असे भाजप नेते अशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
मुंबई महापालिकेतर्फे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, रेनकोटसह विविध २७ वस्तू देण्यात येतात. पण निविदाच मंजूर न झाल्याने साहित्य पोहोचायला ऑगस्ट महिना उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान हे महापालिकेच्या उदासीनतेमुळे होत आहे. हे आशिष शेलार यांनी अधोरेखित करून दिले.
याविषयी बोलातांना त्यांनी मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची कानउघडणी केली. महापालिकेच्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या करून पब्लिक स्कूल नावाने गाजावाजा केला. तर दुसरीकडे गरीब विद्यार्थ्यांनी दप्तर, रेनकोट, पाटी, पेन्सिलशिवाय वर्गात बसायचे. हा कारभार म्हणजे ‘बडा घर पोकळ वासा‘ असा आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी किंवा पहिल्याच आठवड्यात शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे.
यंदाही मुंबईची होणार ‘तुंबई‘
नुकतेच मुंबईचे पालकमंत्री तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मिलन सबवेला भेट दिली. नेहमीच पर्यावरणाप्रती संवेदनशीलता दाखवणारे आदित्य ठाकरेंनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण केली नाहीत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबईची तुंबई होणार असल्याचा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर काही दिवसांपूर्वी स्वतः आदित्य ठाकरे यांनी यंदा मुंबई तुंबणार असल्याचे भाष्य केले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या रस्त्यांवर तसेच रेल्वे रुळांवर पाणी साचण्याची समस्या आहे. दोन दशकांहून अधिक काळ महापालिकेवर सत्तेचा उपभोग घेतलेल्या शिवसेनेने पाणी तुंबण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही. उलट दरवर्षी मुंबई तसेच उपनगरांमध्ये ही समस्या वाढत आहे. आता तर राज्यात आणि पालिकेवर दोन्ही ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे. मात्र असे असतांना देखील मुंबईचा मूळ प्रश्न अजून सुटलेला नाही. दरवर्षी पावसाळ्यात समुद्राचे पाणी मिठी नदीतून आतमध्ये शिरते. तिच्या पात्राची देखील सफाई झालेली नाही. दरवर्षी या नदीच्या सफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. काढलेला गाळ पुन्हा काठारवर ठेवला जातो. तोच पावसात पुन्हा नदीत वाहून जातो. शिवाय इतर गटारं, नाले, रेल्वेररुळांच्या बाजूची गटारे कचऱ्याने भरलेली असतात. कधीच नालेसफाईची कामे पावसाळ्याच्या तोंडावर पूर्ण केली जात नाही. पाणी तुंबल्यावर ढगफुटी झाली तर, ‘प्रशासन काय करणार?’ हे उत्तर ठरलेले असते. यंदाही एकदातरी ढगफुटी होईल आणि मुंबईकरांची तारांबळ होईल हे ठरलेले आहे. ते कोणीच बदलू शकत नाही. नुसते सुशोभीकरण करायचे आणि बकालिकरणाकडे सोईस्करपणे डोळेझाक करून अपयशाचे खापर अतिवृष्टीच्या नावाने फोडायचे ही या सरकारची सवय सगळ्या मुंबईकरांना माहित आहे.
हे सुद्धा वाचा :
BMC Schools : मुंबईतील दोन शाळांचा देशातील अव्वल दहा शाळांमध्ये समावेश, आदित्य ठाकरेंनी केले कौतुक