36 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रएफआरपी थकीत असल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे व निराधार, एम. डी. राजेंद्र जंगम...

एफआरपी थकीत असल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे व निराधार, एम. डी. राजेंद्र जंगम यांचे स्पष्टीकरण

टीम लय भारी

अंबाजोगाई : व्यंकटेश्वरा (अंबासाखर) कारखान्याचे एफआरपी थकीत असल्याचे समाज माध्यमात पसरलेले हे वृत्त पूर्णपणे चुकीचे व निराधार असल्याचे व्यंकटेश्वरा (अंबासाखर) चे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जंगम यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले असून यामध्ये माध्यमांतून केलेल्या आरोवर प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध करत असताना संबंधित संस्थेच्या प्रमुखांना याबाबत खुलासा विचारून प्रसिद्ध करावे, म्हणजे सभासद, शेतकरी, ग्राहक आदींमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही असे म्हणून जंगम यांनी माध्यमांना चांगलेच खडसावले आहे.

सन 2021-22 या वर्षी बीड जिल्ह्यासमोर मोठे ऊस संकट उभे राहिले होते. हजारो हेक्टरवरील ऊसाच्या गाळपचा प्रश्न अनुत्तरीत होता. त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीजने अंबासाखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला घेतला आणि काही दिवसातच 2 लाख 11 हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले. त्यावेळी  संबंधित शेतकऱ्यांना वेळच्या वेळी एफआरपी प्रमाणे ऊसाचे बिल सुद्धा अदा केले. संकटकाळात अंबासाखर कारखानाच्या मदतीने परळी, अंबाजोगाई, केज आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

दरम्यान कारखान्याचे एफआरपी थकीत असल्याच्या बातम्या माध्यमांमधून समोर येऊ लागल्या. त्यामुळे कारखान्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. दरम्यान यावर खुलासा करण्यासाठी व्यंकप्टेरश्वरा (अंबासाखर) चे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जंगम यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आणि कारखान्यातील एफआरपीच्या प्रश्नावर संपुर्ण माहितीच दिली, यावेळी कारखान्याकडे एफआरपीचा एक रुपया देखील थकीत नाही असे स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी यावेळी दिले.

प्रसिद्धीपत्रकानुसार, शासनाने ठरवून दिलेली एफआरपी रक्कम 1997.69 रुपये प्रतिटन इतकी असून व्यंकटेश्वराने प्रतिटन 2000 रुपये प्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वितरीत केल्याचे म्हटले आहे. प्रत्येक पंढरवाड्याचे प्रतिटन 2000 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना वितरित केलेल्या रकमेचे अहवाल व्यंकटेश्वराने यापूर्वीच सादर केले असून, कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 42 कोटी 19 लाख 60 हजार रुपये रक्कम वर्ग केलेली आहे. याबाबत साखर विभागाचे विशेष लेखा परीक्षक, सहकारी संस्था, बीड यांनी कारखान्याने पूर्ण देयके अदा केल्याचा अहवाल साखर आयुक्तांना दि. 07 जुलै रोजीच पाठवलेला आहे व त्याबाबतचे प्रमाणपत्र मागितले असल्याचा संदर्भ सुद्धा येथे देण्यात आला आहे.

एफआरपी रक्कम वेळेत वितरीत करून सुद्धा संस्थकडे एफआरपी थकीत असल्याचे प्रसिद्ध करण्यात आलेले वृत्त चुकीचे व संस्थेची बदनामी करणारे आहे. या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध करत असताना संबंधित संस्थेच्या प्रमुखांना याबाबत खुलासा विचारून प्रसिद्ध करावे, ज्यामुळे संस्थेची बदनामी होणार नाही, तसेच सभासद, शेतकरी, ग्राहक आदींमध्ये सुद्धा गैरसमज निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जंगम यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा…

शिवसेनेची गळती थांबेना, शिंदे गटात अर्जुन खोतकर सामील होणार?

महाराष्ट्रात आणखी एक जिल्हा निर्माण होण्याची शक्यता

उंदीर मारण्यासाठी बनवला विषारी टोमॅटो, महिलेकडून सेवन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी