30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयराजकारणाचे तीन तेरा, जनता देखती सिर्फ मेरा

राजकारणाचे तीन तेरा, जनता देखती सिर्फ मेरा

लेखन: रुपाली केळस्कर

सरकार कोणाचेही असो, जनतेला हव्या असतात. त्या मुलभूत सुविधा. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागल्या तरी सामान्य जनतेला सुखाची झोप येते. कित्येक जण रोज ‘चतकोर’ भाकर खावून, तांब्याभर ‘पाणी’ पिऊन झोपी जातात. आपल्या देशात चांगल्या घरात राहूनही लोकं गरिबीमध्ये दिवस काढत आहेत. पूर्वी झोपडीत राहणार म्हणजेच गरीब असा एक समज होता. परंतु आता कोरोनाने हा गैरसमज दूर केला. कोरानाच्या लाटेनंतर आपल्या राज्यातच नव्हे! तर देशात प्रंचड आर्थिक तंगी निर्माण झाली. कोरोनाच्या या लाटांमध्ये अनेक संसार उध्दवस्त झाले. उदयोग-धंदे नेस्तनाबूत झाले. नोकरी गेली. संसार उघडयावर पडला. अनेक लोक अजूनही कोरोना माहामारीच्या धक्क्यातून मुक्त झाले नाहीत. शिवाय सतत दोनवर्षे आलेली वादळं आणि महापूरं यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला खिळ बसली आहे.

नैसर्गिक संकटांचे परिणाम हे दूरगामी असतात.जनतेला संकटातून काढण्याचे काम सरकारचे असते. पण सरकारच संकटात सापडले असेल तर, त्याला जनता बाहेर काढू शकत नाही. जनतेला केवळ मतं देण्याचा हक्क आहे. निवडणुकांपूर्वी जी लाल गाजरं दाखवली जातात. त्याची मग ही राजकीय मंडळी पुंगी करुन जनतेलाच वाजवून दाखवतात. आता महाराष्ट्रात राजकीय मंडळींचा कसा
कलगीतुरा रंगला आहे. त्यातून जनता केवळ करमणूक करुन घेत आहे. केवळ ‘दोन’ डोक्यांचे सरकार राज्या’गाडा’ हाकत आहे. बंड शमल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथ विधी होऊन तीन आठवडे झाले. तरी देखील शपथविधी झालेला नाही. न्यायप्रविष्ट प्रकरण रेंगाळले आहे. पुढच्याच आठवडयात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. हे ठरवण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला खेटा मारत आहेत. दिल्लीपुढे आम्ही ‘झुकणार’ नाही असे अभिमानाने सांगणा-यांपैकीच आज दिल्ली दरबारात ‘कुर्निसात’ करत आहेत.

दिल्लीने त्यांच्या मनावर गारुडं केलयं. महाराष्ट्राच्या या राजकारणाची सूत्रे दिल्लीश्वरांच्या हातात गेली आहेत. याला लोकशाही म्हणावे का? का ? महाराष्ट्रातले मंत्री संत्री दिल्ली पुढे लोटांगण घालत आहे. केवळ ‘ईडी’ हेच त्याचे कारण आहे का? जनतेला वाटतं ‘ईडी’ हेच कारण आहे. ईडी हे ‘मायाजाल’ आहे. या मायाजालामध्ये अनेक ‘चकवे’ आहेत. ते यात सामील झालेल्या दोन्ही पक्षातील मंत्री गणांना फसवत आहेत. ही एक ‘मयसभा’ आहे. खरं असलं तरी तो ‘अभास’ आहे. ही चाणक्य निती नसून काळीकुटनिती आहे. केवळ महाराष्ट्राला मागे आणण्यासाठी हा सगळा डावपेच आहे.

आपण नैसर्गिक युती केली म्हणजे भाजप शिवसेना युती केली की, मग केंद्राकडून आपल्याला काहीच कमी पडणार नाही असा शब्द दिल्ली दरबारातून आल्यामुळे शिंदे गटाचे आमदार आणि भाजपचे नेते अगदी हुरळून गेले आहे. आपल्याला दिल्लीतून भरघोस निधी मिळणार.आपल्या भागातील विकास कामे होणार. मग जनता जनार्दन आपल्याला आशिर्वाद देणार आणि येणा-या निवडणुकीत आपल्याला भरघोस मतं देणार असे यापैकी सर्वांनाच वाटते. त्यामुळे ते छाती ठोकपणे एकत्र येत गुवाहाटीला खुषकीच्या मार्गाने पळून गेले. तिथे गेल्यानंतर त्यांच्यापैकी अनेकांना अतिशय दुःख झाले. कोणी कोणी रडले म्हणतात? याला अनेकांनी मगर मच्छचे आश्रु देखील म्हटले. त्यांना अतिव दुःख होतं होतं म्हणूनच त्यांनी टेबलावर उभे राहू त्यांनी नाच केला का?

ते जावून दया कोळसा किती उगाळला तरी काळाच? झालं गेलं गंगेला मिळालं. पण आता भाजपला उपरती होऊ लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी’आपण मनावर दगड ठेवून’ एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केल्याचे सोशल मीडियावर म्हटले आहे. या दोघांच्या सरकारला केंद्रातून आणि राज्यातून दोन्हीकडून पाठींबा आहे. त्यामुळे आता मंत्रीमंडळ विस्तार झाला तरी त्याची ‘लगाम’ केंद्राच्या हातातच राहणार आहे. हे अगदी उघडपणे स्पष्ट झाले आहे. ते म्हणतील तशी आपण नंदी बैलाप्रमाणे फक्त मान हालवायची इतकेच काम भावी मंत्रीमंडळाला शिल्ल्क आहे.

आगामी काळात येणारा विकास कामांचा निधी हा मंत्रीगणांच्या नावावर येणार. तो निधी कसा आला. किती आला. याच्या बातम्या पसरवल्या जाणार. मग दुध उकळून उकळून घट्ट झाले की, त्यावरची साय अलगद काढून दिल्ली दरबारी नेणार ! हे न कळण्याइतकी जनता मुर्ख तर नक्कीच नाही. सोशल मीडियामुळे का होईना ! राज्यातील 50 टक्कयांहून अधिक जनता ‘राजकारण साक्षर’ झाली आहे. दिवसातले साधारण 12 तास तरी लोकांचे डोळे मोबाईलवर खिळलेले असतात. डोळे नसतील तर मग कान हेडफोन घालून ऐकण्यासाठी गुंतलेले असतात.

आता दोन तीन दिवसात मंत्री मंडळाची यादी जाहीर होणार आहे. ही यादी काल झालेल्या दिल्ली दौ-यात निश्चित झाली आहे. ती राज्यात आल्यावर जाहीर होणार आहे. या मंत्री मंडळात कोणा कोणाची वर्णी लागणार आहे. याची उत्सुकता राजकीय मंडळींना आणि माध्यमांना आहे. जनतेला नाही. कारण जनतेचा राजकारण्यांवरचा विश्वास उडाला आहे. जनता रोजच्या कामात व्यस्त आहे. पूर, अतिवृष्टीचा सामना करते आहे. शेतीची कामे करते आहे. आपले उदयोग-धंदे नोकरी करते आहे. राजकारण हा केवळ राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाचा खेळ आहे.हे सुज्ञ जनतेला कळून चुकलेले आहे.

राज्यात कोणाची सत्ता असो अथवा नसो,राष्ट्र्पती राजवट लागो अथवा न लागो. सामान्य जनतेला केवळ आपलं घरं महत्वाचं आहे.असामान्य जनता कशीही राहू शकते.जे धनाढय आहेत त्यांनी जगभरातील अनेक देशात राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्याकडे विपूल धनसंपदा असल्याने ते जगाच्या पाठीवर कुठेही राहू शकतात.हेच खरं सत्य आहे. ते जनतेनं स्विकारलयं.

हे सुध्दा वाचा:

‘भाजपला एकनाथ शिंदे नकोसे’

VIDEO : कोणतीही रासायनिक प्रक्रिया न केलेलं एक फळ

शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही – शरद पवार

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी