31 C
Mumbai
Tuesday, March 26, 2024
Homeआरोग्यCorona पसरविणाऱ्या वटवाघळाला समजून घ्या ( डॉ. महेश गायकवाड )

Corona पसरविणाऱ्या वटवाघळाला समजून घ्या ( डॉ. महेश गायकवाड )

Corona संसर्गचा खरा दोषी मनुष्यप्राणीच

डॉ. महेश गायकवाड, वटवाघुळ अभ्यासक

आपण केलेल्या चुकांची फळे आपल्यालाच भोगावी लागतात. त्याचे जिवंत उदाहरण सध्या आपण पाहात आहोत. Corona ने जगात धुमाकूळ घातला आहे. त्यासाठी वटवाघळांना ( BAT ) दोष देण्यापेक्षा ज्या माणसाने गुहेतून त्याला बाजारात आणलं त्या मानवी वृत्तीला दोष द्यावा लागेल.

ऐकायला नवल वाटेल. अर्थात मी 2001 पासून किमान साडेसहा हजार वटवाघुळं  ( BAT ) पकडली आणि पुन्हा निसर्गात नेऊन सोडली. काहीच डिसेक्शन करून त्यांच्या जाती शोधल्या. मात्र मला कधी ‘कोरोना’ ( Corona ) या विषाणूने त्रास दिला नाही. त्याचं कारण मी प्रिकॉशन घेऊन अर्थातच काळजीपूर्वक त्यांचा अभ्यास करीत होतो.

एकदा मी राबर्स केव्ह अर्थात गुहेमध्ये वटवाघळांचा अभ्यास करण्यासाठी गेलो. ती एवढी मोठी गुहा माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. अशी कल्पनासुद्धा नव्हती अगदी दीड ते दोन लाख वटवाघळ असणारी गुहा, एक ते दीड किलोमीटर लांबीची एवढी अफाट गुहेसमोर मी कुठलेही मास्क न वापरता थांबलो. तेवढी मात्र सुरुवातीला चूक झाली आणि त्यात मी दहा दिवस खूप आजारी पडलो. अगदी निमोनियापर्यंत जाऊन आलो. आपल्याला ऐकलं तर नवल वाटेल माझं वजन 65 किलो होते. ते 37 किलो झाले. मात्र प्रतिकारशक्ती खूप चांगली असल्यामुळे मी वाचलो.

डॉक्टरांकडून 10 दिवस केले जाणारे उपाय संपले आणि शेवटी माझ्यावर काटेवाडीजवळ (ता. बारामती) असणाऱ्या काजड बोरी गावातील एका गोसाव्याने उपचार केले. माझ्या नाकात दोन इंजेक्शन भरतील एवढे लिक्विड सोडलं आणि त्यानंतर माझ्या नाकातून आणि डोळ्यातून पिवळसर पाणी वाहू लागले. ते सातत्याने दोन दिवस वाहत होते. तिसऱ्या दिवशी मी अर्धी भाकरी खाण्यापासून सुरुवात केली आणि मृत्यूचा दरवाजा ठोठावून बराही झालो. पुन्हा वीस दिवसांनंतर पुन्हा एकदा मी माझ्या संशोधनाकडे वळलो.

शास्त्रीय पद्धतीने वटवाघळे पकडणे, त्यांना निसर्गात सोडणे, त्यांच्या प्रजाती शोधणे, त्यांच्यापासून होणारे आजार याकडे बारकाईने लक्ष देत मी माझं संशोधन सुरू ठेवले. एकदा कामाला लागलो तद्नंतर मात्र खूप कमी वेळा मी आजारी पडलो.

जगात वटवाघळांची दहशत किती आहे, तर जग बंद झालं.  हो जग बंद झाले आणि ते किती दिवस बंद असेल हे आज तरी कोणीही सांगू शकत नाही. अर्थात बंद होणे याला कारणही माणूसच आहे. कारण वटवाघुळ गुहेतच राहिले असते तर कदाचित आज आपल्याला ही वेळ आली नसती. मात्र आपल्या असंख्य चुकांमुळे आपण अनेक आजार आपल्यापर्यंत आणले. त्यातलाच हा एक आजार ‘कोरोना’.

चिनी माणसाने गुहेतली वटवाघळे ( BAT ) बाजारात आणली आणि बाजारातल्या वटवाघळांनी त्यांचे सूक्ष्मजीव Corona आपल्याला दिले. यात चूक नक्कीच आपलीच आहे. वटवाघळांची नव्हे, हे निमूटपणे कबूल करावंच लागेल. शिवाय आता आपल्या चुकीमुळे किती दिवस आपल्याला आपल्याच घरात बंदिस्त राहावे लागेल हेही सांगता येणार नाही.

सविस्तरपणे सांगायचे झाले, तर जगभरात वटवाघळांचे मुख्य दोन प्रकार आहेत त्यात एक फलहारी वटवाघूळ आणि दुसरे कीटकभक्षी. प्रत्येक वटवाघळांचा जगण्याचा नियम वेगळा आहे. एक हजार पेक्षा जास्त जातीची वटवाघळे जगभरात आढळतात. 20% फलहारी वटवाघळे आहेत तर 80% वटवाघळं कीटकभक्षी आहेत.

आपण मुख्य मुद्याकडे वळूयात. गेल्या वर्षी निपाह व्हायरस आला. त्याच्या अगोदर सुद्धा अनेक प्रकारचे पक्षी व सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी यांच्याकडून आपल्यापर्यंत अनेक विषाणू पोहोचलेत. पण त्यामागील कारण माणूसच आहे. कारण आपण प्रत्येकाच्या अधिवासात जाऊन राहायला लागलो. तिथं मौजमजा करायला लागलो आणि याचा परिणाम आज आपण बघतोय. जग बंद आहे. कारण वटवाघुळ आहे.

सर्वांच्या तोंडात वटवाघुळ कारण असलं तरीही त्याला नष्ट करता येणार नाही. ते करून सुद्धा काहीच उपयोग होणार नाही. कारण प्रत्येक सूक्ष्म जिवाला त्याच्या मित्र प्राण्याबरोबर राहावे लागते. निपाह, रेबीज, कोरोना हे सूक्ष्मजीव वटवाघळांबरोबर राहतात. या विषाणूला विविध प्राण्यांच्या शरीरात जगण्याचा अधिकार निसर्गानेच दिला आहे.

अनंत सूक्ष्मजीव असलेली ही पृथ्वी प्रत्येक सुक्ष्म जीवाला जगण्यासाठी विविध प्राण्यांच्या शरीरात जगण्याचा अधिकार देत असते. हा सुद्धा निसर्गनियमच आहे. अर्थात यालाच तर सहजीवन म्हणतात. सर्व जीवसृष्टी जगत आहे. माणूस फक्त एकटा निसर्गाला सोडून राहतोय आणि परिणाम जग बंद. सातशे कोटी लोकसंख्या असणारी ही पृथ्वी आज केवळ एका प्राण्यांमधील एका व्हायरसमुळे बंद आहे.

आता आपण जाणून घेऊयात की फलहरी वटवाघळांमुळे माणसाला निपाह किंवा रेबीज हा आजार होऊ शकतो. किंबहुना तो गेल्याच वर्षी इंडोनेशियामधील वटवाघळांमुळे जगात पसरण्याचा धोका होता. मात्र वेळीच सावधानता बाळगून जगाने त्यावर मात केली. आपले पूर्वज खूप हुशार होते. कारण रेबीज हा आजार वटवाघळांमुळे वन्य जिवांकडे आणि वन्यजीवांकडून आपल्या पर्यंत पोहोचतो. या गोष्टींची निरीक्षणे करून त्यांनी वटवाघळांकडे दुर्लक्ष करावे असा सल्ला दिला. त्यामुळे वटवाघळांकडे भारतात पाहत नाहीत, पकडत नाहीत किंबहुना ती खातही नाहीत.

काही आदिवासी लोक फलाहारी वटवाघळांना खातात. आपल्याकडे वात हा आजार बळावला तर अशा प्रकारची वटवाघळे पकडून त्यांना उकळत्या तेलात टाकून ते तेल शरीरावर मालिश करण्यासाठी वापरले जाते. मात्र अशाने फरक पडत नाही. मात्र अधिकच विविध प्रकारचे जिवाणू पकडणाऱ्या आणि मालिश करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात.

कोरोना विषाणूचा प्रसार कीटकभक्षी वटवाघळे करत आहेत. त्यामधील एक rhino lophous अशी प्रजातीची वटवाघळे खाल्ल्यामुळे हा आजार माणसा पर्यंत पोहोचला. अर्थात मी जवळपास 100 पेक्षा जास्त या प्रजातीची वटवाघळे पकडून पुन्हा निसर्गात सोडली. माझे संशोधन त्यांच्या प्रजाती शोधण्याचे होते. म्हणून मी ती पकडत होतो. किटकभक्षी वटवाघळांमार्फत रेबीज आणि कोरोना ( Corona ) असे दोन घातक विषाणू आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. मात्र कोणाच्याही घरी येऊन त्यांनी असे आजार पसरवलेत असा आजपर्यंत पुरावा नाही. किंबहुना कुठे अशी चर्चा सुद्धा नाही.

चीनसारखा देश अनेक प्रकारचे किटक, पक्षी, वटवाघळे, साप, अनेक सस्तन प्राणी खुलेआम खात असतात. हे खात असताना जंगलातील पकडून आणलेले प्राणी पिंजऱ्यामध्ये ठेवतात आणि त्यांची उपासमार सुरू होते त्यातच ते वन्यप्राणी आजारी पडतात. आजारी पडलेल्या वन्यजिवांवर अनेक प्रकारचे विषाणू अटॅक करतात. चीनमधील वटवाघळाच्या बाबतीत तेच झाले. ज्यांनी हा वटवाघुळ खाल्ला त्याला पहिला कोरोना झाला.

चीनच्या पहिल्या व्यक्तीमुळे आज जगभर कोरोना पसरला. अर्थात प्रत्येक विषाणूला वाटते की आपला प्रसार जगभर व्हावा आणि म्हणून रेबीज हा विषाणू एखाद्याच्या शरीरात गेला की तो माणूस फक्त चावण्याचे काम करतो आणि पुढच्या शरीरात कसे जाईल याचाच विचार करतो. आज करोना विषाणू सुद्धा हाच विचार करीत जी बॉडी मिळाली तिथे तो शिरकाव करीत आहे. हा विषाणू त्याच्या भवितव्यासाठी खूप आशादायी आहे म्हणून प्रत्येकाच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी तो आसुसला आहे. आज तरी असेच वाटतय.

यावर उपाय एकच. ‘कोरोना’ला प्रवेश बंदी करायची असेल तर प्रत्येकाने आपल्या घरात थांबायला हवे. विनाकारण त्याला आमंत्रण द्यायला ‘कोरोना’बाधित माणसांकडे जाऊ नका. ‘कोरोना’ झाला म्हणजे मरणच आहे असेही नाही. मात्र जे  2 टक्के मरणार आहेत, त्यात आपले व आपल्या नातलगांचे नाव नसावे एवढी काळजी प्रत्येकाने घ्यावी.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाने आपली मानसिक व शारीरिक स्थिती खूप उत्तम ठेवावी.  मानसिक स्थिती सांभाळायची असेल तर मराठी बातम्या फक्त सकाळीच बघा पुन्हा त्या बघू नका. शारीरिक स्थिती उत्तम ठेवायची असेल तर रोजच्या आहारामध्ये खायचं लिंबू जास्त प्रमाणात वाढवा. त्यामुळे विटामिन सी मिळेल. आपल्या कुटुंबासोबत बहुमोल वेळ घालवा.

झाडं, पाखरं, फुलपाखरं, चैत्रपालवी यांची अगदी बारकाईने निरीक्षणे नोंदवा यातच आपल्या जीवनाचा खरा आनंद आहे.  सरतेशेवटी असं वाटतं की निसर्गापासून जे लांब गेलेत त्यांनी त्यांच्या जगण्यातला आनंद व समाधान गमावलेला आहेच. आपण आज पाहतोय आजच्या परिस्थितीत सुद्धा काहि लोक पैसे कमवायची संधी पाहात आहेत. ही तर निव्वळ भिकारी वृत्तीच. मात्र आपले निसर्गाबरोबर नाते टिकवा आणि आपल्या जीवनात आनंद आणि समाधान कमवा.

यावर एकच पर्याय उरतो तो म्हणजे पृथ्वीवर सगळीकडे जंगलच असावे. त्या जंगलात इतर सर्व जीवासमवेत सूक्ष्मजीव असावेत आणि शेवटी माणूस असावा. अर्थात गाव तिथे जंगल, शहर तिथे जंगल हीच भावना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजवली पाहिजे. जंगल वाढवताना सुद्धा स्थानिक वृक्षसंपदा जोपासणे गरजेचे आहे अगदी झाडे झुडपे, वेली ही सगळी स्थानिक प्रजातीची असणे अत्यंत गरजेचे आहे. अत्यंत गरीब देश भूतान आज जगात निसर्गसंपदेने श्रीमंत आहे. तिथे जगण्यातील आनंद आणि समाधान जगात सर्वात जास्त आहे. भारत मात्र 137 व्या क्रमांकावर आहे. ही वृत्ती बदलणे अत्यंत गरजेचे आहे.

सूक्ष्मजीवांना संपवायचे असेल तर हे काम अन्य सूक्ष्मजीव करतील. त्यामुळे प्रत्येक प्राणी जगला पाहिजे प्रत्येक झाड वाचलं पाहिजे. त्यांच्या बरोबर असणारे आपले उपयोगी सूक्ष्मजीव आणि आपल्या विरोधातील सूक्ष्मजीव यांची लढाई होऊद्या माणसाने त्यात विनाकारण पडू नका. नाहीतर यापुढे फक्त स्मशान शांतता प्रस्थापित होईल.

हे सुद्धा वाचा

Coronavirus : रूग्णांची संख्या 89, मुंबईत 14 आढळले

CNN : ‘कोरोना’साठी वाटवाघूळ कारणीभूत नाही

WHO : कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगातील संशोधकांची धडपड

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी