संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना वंदन करण्याचा दिवस, त्यांच्या बलिदानाला आठवण्याचा दिवस म्हणून 21 नोव्हेंबरला मुंबईतील चर्चगेट येथे असलेल्या फ्लोरा फाउंटन येथील हुतात्मा चौकातील स्मृती स्थळावर एकत्र येऊन आदरांजली वाहिली जाते. 21 नोव्हेंबर 1956 रोजी 107 हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानामुळे, त्यागामुळे तत्कालीन सरकारला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. 1956 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या निर्णयाला विरोध होऊ लागला. सरकारच्या या निर्णयामुळे शांत असलेला मराठी माणूस पेटून उठला आणि सरकारचा निषेध करण्यासाठी मुंबईकरांचा एक विशाल मोर्चा मुंबईमधील फ्लोराफाउंटन येथून पुढे वळू लागला.
दरम्यान, हे आंदोलन दडपण्याचे अनेक प्रयत्न सरकारने त्यावेळी केले. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला. परंतु आंदोलकांपुढे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले. परिस्थिती आटोक्याबाहेर जाताना पाहून तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. पोलिसांकडून झालेल्या या गोळीबारात तीनशेहून अधिक आंदोलक जखमी झाले, तर 107 हुतात्म्यांनी आपला प्राण गमवला. सरकारने या अमानुषपणे केलेल्या गोळीबारानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिक तीव्र झाली. त्यामुळे अखेर सरकारने आपला निर्णय मागे घेतला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला मान्यता दिली. त्यानंतर 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.