महाराष्ट्रामध्ये शिंदे-भाजप (Shinde government) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार ? होणार पण की नाही ? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पण आज (ता. ९ ऑगस्ट) अखेरीस या सरकारच्या १८ नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला विरोधी बाकावरील विरोधी पक्षनेते अजित पवार, त्यांचा मुलगा पार्थ पवार यांनी सुद्धा हजेरी लावली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नव्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा देताना टोला लगावला आहे. राज्य सरकारकडून बुलेट ट्रेनसाठी सहा हजार कोटी रुपये देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सरकार हे गुजरातसाठी आहे की महाराष्ट्रासाठी हा एक प्रश्न राज्यासमोर निर्माण झाल्याचे नाना पटोले यांनी म्हंटले आहे.
विदर्भ, मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ असताना राज्याच्या शेतकऱ्यांसाठी द्यायला पैसे नाही, पण बुलेट ट्रेनसाठी द्यायला सहा हजार कोटी आहेत. त्यामुळे हे सरकार गुजरातसाठी बनतेय, अशा पद्धतीचा आपल्या ईडी सरकारने संदेश दिलाय, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे हे सरकार सामान्य जनतेचे सरकार असावे, असे म्हणत नाना पटोले यांनी नव्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा दिल्या आहेत.