मुंब्रा बायपासवर रेतीबंदर जवळील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून मुंब्रा बायपास रस्त्यावरून वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. त्यातच नाशिक, शहापूर, भिवंडीकडून येणारी अवजड वाहतूक कल्याण-डोंबिवलीतून वळविण्यात आली आहे. त्यामुळे काटई, खोणी, तळोजा, कल्याण-डोंबिवलीत वाहतूककोंडी होऊ लागली आहे. मानपाडा रोडवर तर कंटेनर, ट्रेलर्सच्या गर्दीमुळे नागरिक कमालीचे वैतागले आहेत. अशाही स्थितीत काटई नाका, बदलापूर जंक्शन येथे वाहतूक पोलिसांची वसुली सुरूच असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.
मुंब्रा रेतीबंदर पुलाच्या दुरुस्तीचे काम किमान महिनाभर चालेल, अशी चर्चा आहे. मात्र, प्रशासनाकडून अधिकृतपणे तसा काहीही खुलासा केला गेलेला नाही. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढे आणखी किती दिवस वाहतूक बंद ठेवली जाणार आहे, हेही अद्याप प्रशासनाने जाहीर केले नाही.
काटई नाका : वाहतूक पोलिसांची ट्रकचालकांकडून वसुली सुरूच
सध्या मुंब्रा बायपास रोड वाहतुकीला पूर्णत: बंद आहे. महापे ते शीळफाटा अवजड वाहतूक बंद आहे. ही वाहने शहापूर, भिवंडी, कल्याणहून मानपाडा रोडने काटई नाका जंक्शन येथे येत आहेत. काही वाहने कल्याण, हाजी मलंग रोड, नेवाळी नाका, खोणी फाटा अशी येत आहेत. बदलापूर पाईप लाईन रोडवर खोणी-ऊम्बार्ली फाटा येथून JNPT, पनवेलकडे जाणारी वाहने लोढा पलावा क्राऊन, उसाटणे मार्गे तळोजा जाऊ शकतात. मात्र, पोलिस व वाहतूक विभागाचे योग्य नियोजन व ताळमेळ नसल्याने बहुतांश अवजड वाहने काटई नाका जंक्शन येथे पोहोचत आहेत. काटई-कल्याण फाटा रोडवर वाहतुकीचा बहार वाढला आहे. पुढे कल्याण फाटा येथून लेफ्ट टर्न घेऊन अनेक वाहने पनवेल-उरणकडे जात आहेत. योग्य मार्गदर्शन लाभाल्यास अनेक वाहने खोणी फाटा येथून तळोजा जाऊ शकतील. त्यामुळे काटई नाका जंक्शन वर होणारी कोंडी काही अंशी कमी होऊ शकेल. मात्र, इतक्या भीषण स्थितीतही वाहतूक पोलिस काटई नाका बदलापूर जंक्शन येथे ट्रकचालकांकडून वसुली करताना दिसत आहेत. वाहतूक नियमन व नियंत्रणाऐवजी पोलिसांना ट्रकचालकांकडून वसुलीतच रस आहे. त्यासाठी एखाद-दोन ट्रक अडविल्यास मागे लांब रांगा लागतात व कोंडीची समस्या उग्र होते. मात्र, पोलिसांना नागरिकांच्या गैरसोईबाबत काहीही देणे-घेणे दिसत नाही.
रेतीबंदर जवळील मुंब्रा कौसा बायपास रस्ता मधील रेल्वे उड्डाणपुलाची दुरुस्ती व पुलाच्या स्लॅबवर उच्चशक्ती काँक्रीटच्या कामामुळे मुंब्रा बायपास रोड एक एप्रिलपासून बंद झाला आहे. खारेगाव व साकेत पुलाचे मास्टीक पध्दतीने डांबरीकरण व क्षतिग्रस्त एक्सपांशन जॉईंट्स दुरुस्तीही करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. त्या मार्गाने प्रवास करणारी वाहने योग्य मार्गदर्शन व सूचनांअभावी मिळेल त्या मार्गाने प्रवास करत आहेत. मुंब्रा बायपास बंद झाल्यानंतर घोडबंदर रोडवर प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. साकेत आणि खारेगाव खाडी पुलाची दुरुस्ती करताना नाशिक महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम होत आहे.
मुंब्रा बायपास मार्गे जेएनपीटी, कळंबोली नवी मुंबईकडून भिवंडी, नाशिक, गुजरातकडे राज्य महामार्ग क्र ३ अथवा घोडबंदर रोडने जड-अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. आता मुंब्रा कौसा बायपास येथील पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत डायव्हर्शन प्रभावी राहणार आहे. अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांच्या हलक्या चारचाकी वाहनांसह या प्रकल्पांसाठी दुरुस्तीचे साहित्य घेऊन जाणारी मालवाहू वाहने या निर्बंधांमधून वगळण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा :
एकनाथ शिंदे यांना वेळच मिळत नसल्याने मुंबईतील तीन पूलांचे उदघाटन रखडले
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरीत होणार
JNPT : खासगीकरणाची पहिली बळी ठरली जेएनपीटी!
मुंब्रा बायपास पर्यायी मार्ग –
- मुंब्रा बायपास रोड 1 एप्रिलपासून वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याने जेएनपीटी, नवी मुंबई, पुणे येथून महापे मार्गे येणारी सर्व नाशिक, गुजरात किंवा भिवंडीकडे जाणारी वाहने शिळफाटा येथून महापे-रबाळे-ऐरोली मुलुंड पूल-पूर्वेकडे वळवली जातील.
- एक्सप्रेसवे आणि मुलुंड आनंदनगर – माजिवडा – घोडबंदर रोड वापरून आपापल्या गंतव्यस्थानाकडे जातील.
- भिवंडीकडे जाणारी वाहने कापूरबावडी सर्कलमधून उजवीकडे वळण घेऊन कशेळी – काल्हेर – अंजूर चौक मार्गे पुढे जाऊ शकतात.
- गुजरातमधून येणाऱ्या आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यासाठी घोडबंदर रोड-माजिवडा-आनंदनगर मार्गाने जावे लागेल.
- जड वाहनांना शहराच्या हद्दीत रात्री 10 ते पहाटे 5 या वेळेतच चालण्याची परवानगी असेल.