आबासाहेब : हात आभाळाला, पाय जमिनीला (निवृत्त IAS चंद्रकांत दळवी यांचा लेख)

मी शासकीय नोकरीमध्ये १९८३ मध्ये रुजू झालो. त्याआधीपासून आमदार देशमुख यांच्याबद्दल ऐकून होतो(Ganpatrao Deshmukh a great Politician). त्यांच्याबद्दल वर्तमानपत्रातूनही वाचायला मिळायचे. १९८८ मध्ये माझी बदली सोलापूर जिल्ह्यात झाली आणि तेव्हापासून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी माझा परिचय झाला आणि त्यानंतर ओळखीचं रूपांतर वैयक्तिक संबंधामध्ये झालं.

कै. गणपतराव देशमुख यांना ‘पद्म’ सन्मान देण्याची मागणी !

प्रशासनात वेगवेगळ्या पदांवर काम करीत असताना राजकीय लोकांसोबत काम करावं लागतं. अनेक स्वभावाचे, अनेक तऱ्हेचे पुढारी पाहायला मिळतात. पण, माझ्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेते एक राजकीय नेता वेगळाच पाहायला मिळाला. असा नेता इथून पुढे निर्माण होईल असं वाटत नाही. अशा या निःस्पृह, निष्कलंक, प्रामाणिक नेत्याविषयी लोकांना माहीत असणं गरजेचं आहे. म्हणूनच मी या नेत्याविषयी ‘लय भारी’च्या राजकीय अंकात थोडं लिखाण करू इच्छितो. या नेत्याचं नाव आहे गणपतराव देशमुख(Ganpatrao Deshmukh). मी शासकीय नोकरीमध्ये १९८३ मध्ये रुजू झालो. त्याआधीपासून आमदार देशमुख यांच्याबद्दल ऐकून होतो. त्यांच्याबद्दल वर्तमानपत्रातूनही वाचायला मिळायचं. १९८८ मध्ये माझी बदली सोलापूर जिल्ह्यात झाली आणि तेव्हापासून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी माझा परिचय झाला आणि त्यानंतर ओळखीचं रूपांतर वैयक्तिक संबंधामध्ये झालं.

सोलापूर जिल्ह्यात माझा अनेक लोकप्रतिनिधींशी संबंध आला. त्यात बार्शीचे तत्कालीन आमदार व माजी मंत्री श्री. दिलीप सोपल यांच्यापासून कै. गणपतराव देशमुख यांच्यासह अनेक जण होते. सोलापूरमध्ये रुजू झाल्यापासूनच आबासाहेबांच्या नावाचा धाकयुक्त दरारा प्रशासनामध्ये जाणवू लागला. पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या (डीपीडीसी) बैठकीच्या निमित्ताने त्यांना पाहण्याचा योग आला आणि आवर्जून त्यांना भेटून स्वत:हून ओळख करून घेतली. त्यांनी स्मितहास्य करून थोडीफार विचारपूस केली आणि ते हातातील कागदपत्रं वाचण्यात मग्न होऊन गेले. मनमोकळेपणानं बोलणं आणि गप्पा मारणं हा त्यांचा स्वभावच नव्हता, हे पुढे पुढे लक्षात येऊ लागलं. प्रत्येकाचा आपापला एक स्वभाव असतो.

दिवंगत गणपतराव देशमुखांचे नाव घेऊन पळपुट्या आमदाराची निर्लज्जे विधाने

त्यानंतर कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेटण्याचा योग लवकरच आला. दुपारची नागरिकांना भेटीची वेळ होती. अनेक जणांच्या चिठ्ठ्या होत्या. त्यामध्ये एक चिठ्ठी गणपतराव देशमुख यांचीही होती. त्यावेळी देशमुख साहेबांची सांगोला विधानसभेचे लोकप्रतिनिधी म्हणून चौथी किंवा पाचवी टर्म असावी. इतके ज्येष्ठ आमदार असूनसुद्धा नागरिकांच्या भेटीच्या वेळी आणि तेही इतर सामान्य नागरिकांप्रमाणेच चिठ्ठी पाठवून अधिकार्‍यांना कामासाठी भेटणारे आमदार विरळाच. इथेही त्यांचं वेगळेपण दिसून येतं. त्यानंतरही अनेक वेळा ते कार्यालयात भेटायला यायचे. येताना कसलाही बडेजाव नसायचा. सोबत कार्यकर्त्यांचा संच नाही. ज्याचं काम आहे, ती व्यक्ती बरोबर नाही. आमदारांसोबत एरवी असणारा स्वीय सहायकही सोबत नाही. फक्त एक चामड्याची बॅग आणि त्यामध्ये कामाचे कागद एवढंच त्यांच्याजवळ होतं. भेटीला आल्यानंतर सरळ मुद्द्याला हात घालणारे, इकडच्या-तिकडच्या गप्पा न मारणारे. काम झाल्यानंतर क्षणभरही कार्यालयात न थांबणारे आबासाहेब एक वेगळंच व्यक्तिमत्त्व होतं.

सन १९९९ मध्ये माझी नेमणूक मंत्रालयामध्ये महसूल व वन विभागामध्ये उपसचिव म्हणून झाली आणि त्यानंतर सन २००० मध्ये कै. आर. आर. पाटील साहेब ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री झाल्यानंतर त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला. दोन्ही आबाच; मात्र एक आबासाहेब आणि दुसरे फक्त आबा. दोघांचे मतदारसंघही एकमेकाला लागूनच. आबासाहेबांचा सांगोला सोलापूर जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील शेवटचा; तर आबांचा तासगाव-कवठेमहांकाळ सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडील शेवटचा. दोघेही एकाच जातकुळीतील (दोघांची कार्यशैली जवळपास एकाच प्रकारची) लोकप्रतिनिधी. सामान्य माणसांना आधार, मतदारसंघातील प्रत्येक नागरिकावर प्रेम, मतदारसंघातील विकासकामांप्रति तीच तळमळ, दुष्काळी पट्ट्यातील असल्यामुळे त्यांनी जलसिंचनाला प्रथम प्राधान्य दिले. आपापल्या हयातीमध्ये जलसंधारण आणि जलसिंचनाचे तालुक्यातील सर्व ते प्रकल्प राबवून दुष्काळी तालुक्यांचे जलसमृद्ध तालुक्यात रूपांतर करून, जनसामान्यांचे जीवनमान पराकोटीचे उंचावणारे लोकप्रतिनिधी. विधिमंडळातील कामकाजावर दोघांचीही तेवढीच निष्ठा आणि पकड. जिल्ह्यामध्ये काम करताना जिल्ह्याचा विचार आणि राज्य पातळीवर व विधिमंडळात काम करताना राज्याच्या विकास व प्रगतीचा विचार करणारे आणि त्यासाठी स्वत:ला वाहून घेणारे, झोकून देणारे लोकप्रतिनिधी. दोघांनाही एकमेकांबद्दल प्रचंड आदर, दोघेही सामान्य कुटुंबातून आलेले आणि शेवटपर्यंत सामान्यच राहिलेले.

विधान भवन परिसरात गणपतराव देशमुख यांचा पुतळा उभारण्याची मागणी

आवाजामध्ये जरब, प्रचंड अभ्यास, घटना, आकडेवारी इत्यादींची मुद्देसूद मांडणी आणि सभागृहासमोर विचारार्थ नेमका मुद्दा, प्रस्ताव मांडून ते थांबायचे. सभागृहातील त्यांचं वागणं, बोलणं सर्वांनाच अनुकरणीय असायचं.

राजकीय जीवनामध्ये काम करताना अनेक सामाजिक उपक्रमांत आणि सहकारामध्ये त्यांचं मोठं योगदान असायचं. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे आबासाहेब कित्येक वर्षं सदस्य होते. मलाही रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य होण्याची संधी सन १९९९ मध्ये मिळाली. तेव्हापासून आबासाहेबांना रयत शिक्षण संस्थेच्या प्रगती अन् गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करताना मी जवळून अनुभवलं आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. नेहमी त्यांची सहजासहजी भेट व्हायची नाही. ९ मे रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथे आयोजित कार्यक्रम आणि जनरल बॉडीच्या वार्षिक सभेसाठी ते अवश्य यायचे. त्यावेळी त्यांच्या भेटीची वार्षिक संधी मिळायची. रयत शिक्षण संस्थेमधील त्यांचे योगदान, राजकीय व सामाजिक जीवनामध्ये त्यांनी केलेल्या काम याबद्दल रयत शिक्षण संस्थेने या वर्षी कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने आबासाहेबांच्या निधनानंतर त्यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान केला.

महाराष्ट्र राज्याचा सहकार आयुक्त म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या सहकारामधील आबासाहेबांच्या योगदानाचीही जवळून ओळख झाली. सांगोला सहकारी सूतगिरणीची स्थापना त्यांनी केली. राज्यातील निवडक आदर्श सहकारी सूतगिरण्यांमध्ये तिची गणना केली जायची. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, सोलापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा दूध संघ, अशा सहकार क्षेत्रातील सर्व प्रमुख सहकारी संस्थांमध्ये ते कित्येक वर्षं सातत्यानं संचालक म्हणून काम करीत होते.

सहकारामध्ये खर्‍या अर्थानं तळागाळातील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. सहकार कायदा, नियम, विविध संस्थांची नियमावली यांचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता. अशा सहकारातील हाडाच्या कार्यकर्त्याला राज्याचा सहकारमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आबासाहेबांचा मंत्री, तसेच सहकार मंत्री म्हणून असलेला कालखंड आजही आदर्शवत मानला जातो. मंत्री असतानाही राजशिष्टाचाराच्या सर्व प्रथा बाजूला ठेवून वागणारा आणि काम करणारा मंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता. मुंबईहून सिद्धेश्‍वर एक्स्प्रेसने कुर्डूवाडी जंक्शनला उतरल्यानंतर मंत्र्यांसाठी असणारा गाड्यांचा ताफा बाजूला ठेवून एसटी किंवा ट्रकमध्ये ड्रायव्हरशेजारी बसून सांगोल्याला जाणारे गणपतराव देशमुख सर्वांना माहितीचे आहेत. पराकोटीचा साधेपणा म्हणजे गणपतराव देशमुख, असे समीकरणच महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबाबत रुजू झाले होते.

शरद पवारांनी गणपतराव देशमुखांच्या सोबतच्या जागवल्या जुन्या आठवणी

सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्येही सर्वांत जास्त दुष्काळी तालुका म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे. अशा या शापित तालुक्याचा भाग्योदय सुरू झाला तो १९६२ मध्ये गणपतराव देशमुख या तालुक्याचे आमदार झाल्यापासून. तालुक्याचा विकास करायचा असेल, तर शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले पाहिजे, हाच त्यांचा ध्यास असायचा. त्या त्या काळातील राज्य व केंद्राच्या ज्या ज्या म्हणून जल आणि मृदसंधारणाच्या योजना असायच्या, त्या तालुक्यामधील प्रत्येक गावात घेऊन जायच्या आणि प्रभावीपणे राबवायच्या हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असायचा. रोजगार हमी योजनेची आणि ‘मनरेगा’ची जल व मृदसंधारणाची कामे राज्यात सर्वांत अधिक जर कुठल्या तालुक्यात झाली असतील, तर ती सांगोला तालुक्यात आणि ती झालीत सन्माननीय गणपतराव देशमुख यांच्यामुळेच. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढत चालली आणि विहिरी, विंधन विहिरींना पाणी उपलब्ध होऊ लागले. तालुक्यातील सर्व गावांना फळबाग लागवड आणि विशेषत: कमी पाण्यावर येणार्‍या डाळिंब पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्याची प्रेरणा आबासाहेबांनी तालुक्याला दिली. सूक्ष्म जलसिंचनाचा प्रभावी वापर महाराष्ट्रात पहिल्यांदा सांगोला तालुक्यात सुरू झाला तोही आबासाहेबांमुळेच. आज सांगोल्याची ओळख डाळिंबाच्या उत्पादनासाठी झाली आहे. त्याचबरोबर कमी पाण्यावर येणाऱ्या इतर फळबागाही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. सांगोल्यासारख्या सर्वांत दुष्काळी तालुक्यातील गावागावांतील शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला आणि त्यांचे जीवनमान उंचावले. यामधील आबासाहेबांचे योगदान तालुका आणि जिल्हा कधीच विसरणार नाही. आता कृष्णा खोर्‍यातील विविध उपसा जलसिंचन योजनांचे पाणी सांगोला तालुक्यामध्ये आबासाहेबांनी आणल्यामुळे सांगोल्यासारख्या दुष्काळी तालुक्याचे नंदनवनात रूपांतर होणार आहे. आबासाहेबांच्या संपूर्ण वाटचालीत या माणसाचे हात आभाळाला होते; मात्र पाय अखेरपर्यंत जमिनीवर होते.

IAS चंद्रकात दळवी म्हणतात; अर्थसंकल्पात कृषीला न्याय, ग्रामविकासाकडे दुर्लक्ष

 

 

तुषार खरात

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

4 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

6 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

8 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

9 hours ago