डॉक्टर हा देवदूत समजला जातो. त्यामुळेच की काय डॉक्टरी पेशाला समाजात खूप मान, सन्मान आहे. भारतात गेल्या 32 वर्षांपासून (1991 पासून) दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन म्हणून साजरा केला जातो. प्रख्यात डॉक्टर बिधानचंद्र रॉय हे राजकारणी, स्वातंत्र्यसैनिक आणि पेशाने वकील होते. डॉक्टर हे देशाचे सैनिक आहेत, जे सीमेवर लढत नाहीत; पण जीव वाचवण्यासाठी आणि आयुर्मान सुधारण्यासाठी समर्पितपणे काम करतात. मानवी आरोग्यासाठी त्यांचे योगदान अपेक्षेपलीकडे आहे. कोविड-19, प्लेग, फ्लू, एड्स, इबोला आणि सर्वसामान्य लोकांचे रक्षण करण्यासाठी इतर साथीच्या रोगांचा नायनाट करण्याचे काम ते नेटाने करत असतात.
राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचा इतिहास
भारतात आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर मंडळींच्या योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी, डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ 1 जुलै 1991 रोजी प्रथम राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा करण्यात आला होता. डॉ. रॉय यांचा जन्मदिवस 1 जुलै 1882 रोजी झाला. 1 जुलै 1962 रोजी त्यांचा मृत्यू झाला. डॉ बिधान चंद्र रॉय एक प्रसिद्ध डॉक्टर,शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्य सेनानी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते. ते 1948 ते 1962 पर्यंत 14 वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीदेखील होते. 4 फेब्रुवारी 1961 रोजी त्यांना “भारतरत्न” हा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार मिळाला. त्यांनी आपले जीवन लोकांसाठी समर्पित केले. अनेक व्यक्तींवर उपचार केले आणि लाखो लोकांना प्रेरणा दिली. 1976 मध्ये बीसी रॉय यांच्या समरणार्थ राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली. वैद्यक, विज्ञान, सार्वजनिक व्यवहार, तत्त्वज्ञान, कला आणि साहित्य या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तीला त्यांच्या नावाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
समाजात डॉक्टरांचे महत्त्व आणि भूमिका
समाजात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची आहे. ते त्यांचे जीवन रुग्णांच्या कल्याणासाठी वाहून घेतात, रोग किंवा अन्य व्याधीतून रुग्ण लवकर बरा होण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात कायम आनंद मिळावा, ते निरोगी रहावे यासाठी मदत करत असतात. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून हल्ले होऊनही डॉक्टरांनी हार मानली नाही अशा अनेक घटनांमध्ये सामान्य लोकांसाठी ते वैद्यकीय सेवा अविरतपणे पुरवत असतात. त्यांचे योगदान आणि अथक परिश्रम कोणीही विसरू शकत नाही.
हे सुध्दा वाचा:
बुलढाणा अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल; ट्विट करत व्यक्त केला शोक
समृध्दीवर अपघाताचे सत्र सुरूच; बुलढाण्याजवळ अपघातात 25 प्रवासी ठार
ईडी सरकारच्या काळात गुन्हेगार मोकाट; नाना पटोले यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे महत्त्व
समाजातील डॉक्टरांच्या भूमिकांचे महत्त्व ओळखण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी भारतात राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा केला जातो. हे डॉक्टरांद्वारे रुग्णाच्या काळजीसाठी दिलेले महत्त्व, महत्त्वपूर्ण भूमिका आणि जबाबदाऱ्या जाणून घेण्यास सर्वसामान्य लोकांना मदत करते. या विशेष दिवशी प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाचे आरोग्य सुधारण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे कुशल वैद्यकीय तज्ञ असल्याचा अभिमान वाटला पाहिजे आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आणि योगदानाबद्दल कृतज्ञ असले पाहिजे. प्रत्येक भारतीय नागरिकाने वैद्यकीय आणीबाणी आणि साथीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सामान्य जनतेला मदत करण्याच्या प्रत्येक डॉक्टरांच्या प्रयत्नांप्रती कृतज्ञ राहिले पाहिजे आणि त्यांचे कौतुक केले पाहिजे. कोविड-19 महामारीच्या काळात वैद्यकीय कर्मचार्यांचे (डॉक्टर आणि परिचारिका) काम मोठे होते. भारतात आतापर्यंत आलेल्या विविध साथ आजारात डॉक्टर मंडळींनी केलेले काम खूप महत्वाचे आहे.