टीम लय भारी
मुंबई : राष्ट्रपिता म. गांधी यांच्या ‘हत्येला’ जाहीरपणे ‘वध’ म्हणणा-या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) घणाघाती टीका केली आहे.
राष्ट्रपिता म. गांधी ‘हत्येला’ जाहीरपणे ‘वध’ म्हणताना तुम्हाला लाज (Shameful) कशी वाटली नाही? किती दिवस नथुराम कौतुक करणार आहात? विषारी विचारांची पेरणी किती वर्षे करणार आहात? असे ट्विट राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lawande) यांनी केले आहे.
नितीनजी गडकरी @nitin_gadkari राष्ट्रपिता म.गांधी
' हत्येला ' जाहीरपणे ' वध ' म्हणताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही? किती दिवस नथुराम कौतुक करणार आहात ? विषारी विचारांची पेरणी किती वर्षे करणार आहात ? @LoksattaLive @OfficeOfNG— Vikas Lawande (@VikasLawande1) May 21, 2020
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीतून आणि भाजपाच्या नेतृत्वात परिपक्व झालेल्या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना हत्या आणि वध यातील फरक कळू नये? ही फारच लाजिरवाणी गोष्ट आहे, असेही ते ‘लय भारी’ टीमशी बोलताना म्हणाले.
एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात आले असता त्यांना गुजरातच्या साबरमती आश्रमात घेऊन जाता. निवडणुका आल्या की गांधीजींच्या नावाने मते मागता आणि नंतर मात्र सरड्यासारखे रंग बदलत त्याच महात्मा गांधीजींना कमी लेखण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?, असा प्रश्न विकास लवांडे यांनी विचारला आहे.
नितिन गडकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात गांधींचा ‘वध’ असे उद्गार काढले. ‘वध’ हा शब्द कोणासाठी वापरायचा हे गडकरींना आता आम्हाला शिकवावे लागेल काय? रामायणात प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला. तर महाभारतात श्रीकृष्णाने कंसाचा वध केला. प्राचीन काळातही आपल्या देवदेवतांनी अनेक दुष्ट राक्षसांचा वध केला. मग नथुराम हा तुमच्यासाठी देव आणि गांधीजी हे दानव आहेत का? नितिन गडकरी हे जर महात्मा गांधी यांना दुष्ट म्हणत असतील तर त्याच गांधीजींच्या नावाचा वेळोवेळी आपल्या फायद्यासाठी वापर का करुन घेता?, असा सवालही विकास लवांडे यांनी केला आहे.