टीम लय भारी
मुंबई : पहिल्यापासूनच संकटाची मालिका मागे लागलेल्या मुंबईतल्या कांजुरमार्ग कारशेड (Kanjurmarg car shed case) प्रकरणी आता आणखी एक नवा वाद समोर आला आहे. या जमिनीचे मालक महेश गारोडिया यांनी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि एमएमआरडीएच्या आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. कोर्टाचा आदेश असताना देखील आपल्याला काहीही न कळवता कारशेडसाठी जमीनीचे परीक्षण सुरु केल्याबद्दल त्यांनी ही कायदेशीर नोटीस बजावली आहे.
मुंबई सिटी सिव्हील कोर्टाने 16 एप्रिल 2016 रोजी गारोडियांच्या जमिनीची लीज रद्द करुन एमएमआरडीएकडे जमीन देण्यासाठी मनाई करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाची आठवण गारोडिया यांनी कायदेशीर नोटीसमध्ये करुन दिली आहे. तसेच कोर्टाच्या आदेशाचा सन्मान करत एमएमआरडीएने या जमिनीवर आणलेली यंत्रसामुग्री हटवावी, असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.
कांजुरमार्गची जागा ही महाराष्ट्राचीच असून त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधला वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे.
कांजूरमार्गमधील जागा ही मिठागराची असून त्यावरचा हक्क अद्याप सोडला नाही, त्यामुळे ही जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय रद्द करा, असे पत्रच केंद्र सरकारने राज्याच्या सचिवांना पाठवले आहे. त्याचबरोबर कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम त्वरीत थांबवा, असेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. आता त्या जमीनीवर अन्य व्यक्तीने हक्क सांगत जिल्हाधिका-यांना नोटीस पाठवली गेल्याने नवीनच वाद समोर आला आहे.