टीम लय भारी
मुंबई : पालघरमध्ये झालेली दुर्घटना अत्यंत निषेधार्ह आहे. ही घटना गैरसमजूतीमधून झाली होती. परंतु पोलिसांनी लगेचच कारवाई केली. 110 आरोपींना तात्काळ अटक केली आहे. या घटनेचा ‘कोरोना’शी काहीही संबंध नाही. परंतु या घटनेच्या निमित्ताने महाराष्ट्राची प्रतिमा मलीन केली जात आहे, हे योग्य नाही अशी भावना शरद पवार ( PawarSpeaks ) यांनी व्यक्त केली.
पवार ( PawarSpeaks ) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना व लॉकडाऊनबाबत पवार यांनी यावेळी विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले की, देशात व महाराष्ट्रात ‘कोरोना’बाधितांचा आकडा वाढत आहे. देशातील मृत्यू झालेल्यांची संख्या 590 आहे, पण महाराष्ट्रातील मृत्यूंची संख्या 223 आहे. महाराष्ट्रातील ही संख्या निश्चितच चिंताजनक आहे. परदेशातील आकड्यांच्या तुलनेत आपल्याकडील स्थिती दस पटीने चांगली आहे. म्हणून त्यात समाधान मानता येणार नाही. हा आकडा आणखी कसा कमी करता येईल याकडे लक्ष द्यायला हवे.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण – डोंबिवली या ठिकाणी ‘कोरोना’बाधितांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ‘कोरोना’बाधितांची संख्या अटोक्यात आली तर आपण अनेक गोष्टी साध्य करू शकतो.
देशाच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक आहे. राष्ट्रपती भवनमध्येही काही ‘कोरोना’ रूग्ण सापडले. हा संसर्ग आजार आहे. दोन लोकांमध्ये अंतर ठेवण्याची सुचना आपण पाळत नाही. त्यामुळे जिथे परिस्थिती नाही तिथे सुद्धा संकट निर्माण होत असल्याचे पवार म्हणाले.
प्रसारमाध्यमांनी सुद्धा भितीदायक माहिती देण्याऐवजी दिलासा व लोकांमध्ये आत्मविश्वास वाढविणाऱ्या बातम्या द्यायला हव्यात.
मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण – डोंबिवली येथील कोरोनाग्रस्तांची व मृत्यूमुखीची आकडेवारी पाहिली तर उर्वरीत महाराष्ट्राचे चित्र समाधानकारक आहे. परंतु लॉकडाऊनचा निर्णय संबंध महाराष्ट्रासाठी लागू झालेला आहे. त्यामुळे मुंबई – पुणे सोडले तर राज्यात ज्या ठिकाणी ‘कोरोना’ची गंभीर परिस्थिती नाही तिथे सुविधा देणे शक्य आहे. त्यातून अर्थव्यवस्थेला गती देता येईल. शेतीची कामे करता येतील.
सरकारने दिलेल्या झोनमधील कारखान्यांमधील कामे करता येतील. त्यातून हळूहळू व्यापार सुधारायला मदत होईल. परिणामी आर्थिक परिस्थिती सावरण्याचे काम आपण गाठू शकतो, असा आशावादही पवार ( PawarSpeaks ) यांनी यावेळी व्यक्त केला.
वैद्यकीय व पोलीस दलातील लोक अहोरात्र काम करीत आहेत. इतरही सरकारी यंत्रणेतील अनेक कर्मचारी काम करीत आहेत. जीवावर उदार होऊन ही मंडळी काम करीत आहेत.
राज्यातील प्रशासकीय यंत्रणेवर माझा विश्वास आहे. लातूरचा भूकंप, मुंबईची दंगल व बॉम्बस्फोट प्रकरणात मी प्रशासकीय यंत्रणेची क्षमता पाहिली आहे. त्यामुळे ‘कोरोना’च्या या संकटातही आपली प्रशासकीय यंत्रणा परिस्थिती सुरळीत करेल.
गावोगावच्या जत्रा बंद झाल्या आहेत. त्यामुळे पैलवान, कलावंतांचे कार्यक्रमही बंद झाले. वाघ्या मुरळी, गोंधळी यांचेही नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्याचा निर्णय लगेच घेता येणार नाही. पण हे संकट सरले की, त्यानंतर काहीतरी उपाययोजना करता येतील. मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे कालांतराने कुस्तीच्या स्पर्धा आयोजित करण्याबाबत माझा ( PawarSpeaks ) विचार आहे.
दुध, शेती मालाच्या किंमती पडल्या आहेत. पण 3 मे नंतर परिस्थिती बदलू शकेल. वृत्तपत्र विक्रीला परवानगी आहे. परंतु ते घरोघरी पोचविण्यात अडचणी आहेत. वृत्तपत्र विक्री करणारी एकट्या मुंबईत 70 हजार मुले आहेत. त्यामुळे या मुलांना व इतरांनाही ‘कोरोना’चा धोका निर्माण होऊ शकतो, असे पवार ( PawarSpeaks ) म्हणाले.
चार – पाच दिवसानंतर रमझान सुरू होणार आहे. परंतु मुस्लीम बांधवांनी घरातूनच नमाज अदा करावा. दरवर्षीप्रमाणे तुम्हाला बाहेर येऊन हा सण साजरा करता येणार नाही, असे आवाहनही पवार ( PawarSpeaks ) यांनी केले.
हे सुद्धा वाचा
Coronavirus : ‘रेशन वाटपामध्ये दारिद्र्याचा छटा शोधू नका’
पालघर मॉब लिंचिंग : घटना को साम्प्रदायिक रंग देने की हुईं खूब कोशिशें, सोशल मीडिया पर चले ग़लत दावे