31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी साधला कोकणवासियांशी संवाद, विकासकामे करण्याची दिली हमी

मुख्यमंत्र्यांनी साधला कोकणवासियांशी संवाद, विकासकामे करण्याची दिली हमी

 

टीम लय भारी

मुंबई :- आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोकणातील लघु पाटबंधारे योजनांचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले.  मुसरे-आंगणेवाडी, कोल्हापूरी पाटबंधारा योजना मालोड-मालाडी तालुका मालवण तसेच लघु पाटबंधारे योजना कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदूर्ग या योजनांचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास सिंधुदूर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंत, मंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक राज्यमंत्री मृद व जलसंधारण खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत,  माजी राज्यमंत्री दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक,  रोहयो आणि जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग मंजुलक्ष्मी यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर देखील या भूमिपूजनास उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भराडी मातेला वंदन करून कोरोना राक्षस नष्ट करून हा माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना केली. आंगणेवाडीच्या जत्रेत कोरोना काळात गर्दी करू नका या केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी लाखो भाविकांना धन्यवादही दिले. माझ्या शक्तीचा कण न कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे असा आशीर्वाद भराडी देवीकडे मागतांना मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही दिली.

अंगणेवाडीची जत्रा ही कोकणवासीयांचे श्रद्धास्थान      

अनेक वर्षे या जत्रेबद्दल मी ऐकत होतो, गेल्यावर्षी तिथे मुख्यमंत्री म्हणून येता आले याचे खुप समाधान आहे. यावेळी कोरोनामुळे आभासीपद्धतीने तुमच्याशी बोलत आहे. आभासी शब्द मला आवडत नाही परंतु पर्याय नाही. आज जरी मी तिथे तुमच्यात प्रत्यक्ष नसलो तरी मनाने मी तिथेच आहे. मला गेल्यावर्षीचे भक्तांनी फुलून गेलेले मंदिर आठवते. भराडी मातेची कृपा म्हणून इतके वर्षे मार्गी न लागलेल्या या तीन योजना आज मार्गी लागत आहेत याचा निश्चित आनंद आहे. भराडी मातेला वंदन करून प्रत्येकजण काही ना काही मागतो पण मी भराडी मातेला विनंती करतो की, माझ्या शक्तीचा कण न कण कोकणवासियांसाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी वापरता येऊ दे, माझ्या हातून महाराष्ट्राचा विकास होऊ दे.

कोरोनाच्या काळात आपण काम करत आहोत. अनेकजपण भराडी देवीच्या उत्सवाची वाट पहात आहेत मला माहित आहे, पण आज आपण सगळेजण एकत्र येऊन कोरोना नामक संकटाचा मुकाबला करतो आहोत. आपण सगळे सहकार्य करत आहेत म्हणून कारोनाची दुसरी लाट आपण थोपवू शकत आहोत. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, कोकणात पाऊस भरपूर पडतो, पूर येतो, अतिवृष्टी होते पण ते संपल्यानंतर सगळे पाणी वाहून समुद्राला मिळते. अनेक ठिकाणी पाऊस पडून गेल्यानंतर उरलेले सगळे वर्ष कोरड जाते. मग अनेक खलबत होतात, योजना पुढे येतात. पण आज अरविंद सावंत, विनायक राऊत यांनी या तीन योजना पुढे आणल्या. त्या कागदावर न ठेवता प्रत्यक्षात येण्यासाठी पाठपुरावा केला. योजनांसाठी पाठपुरावा करून करून घेता, याला अधिक महत्व आहे.

राज्यात अनेक धरण, पाटबंधारे झाले आहेत. परंतु अजून काही कामे बाकी आहेत. आता आपण गोसीखुर्द धरणाच्या कामाला गती दिली आहे. नुकताच मी तिकडे जाऊनही आलो. आज या तीन पाटबंधारे कामांचे आपण भूमिपूजन ऑनलाईन करतो आहोत. पण धरणाच्या उदघाटनाला मी तिथे प्रत्यक्ष येईल हे माझे तुम्हाला वचन आहे. बहुतेकजण स्वत:साठी काही ना काही मागत असतात पण मला आनंद आहे की, कोकणातील माझे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक, विश्‍वस्‍त म्हणून काम करत आहेत, स्वत:साठी काही न मागता जनतेसाठी हॉस्पीटल आणि इतर गोष्टी मागत आहेत.

रत्नागिरी येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार सुरु असल्याचे ही मुख्यमंत्र्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना सांगितले.  संपूर्ण कोकणपट्टा सुंदर आहे, निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. माझे कोकणावरचे प्रेम मी कधी लपवलेले नाही म्हणूनच मी गेल्यावर्षी भराडी देवीच्या दर्शनाला आलो होतो तेंव्हा आपण सगळ्यांनी मिळून  कोकणातील योजना आणि व्यथांचा विचार केला. त्यातील अनेक गोष्टी मार्गी लावत असतांना कोरोना आला आणि सगळं ठप्प झाले. असे असले तरी कोकणचा विकास मार्गी लावणार म्हणजे लावणारच असे ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

चिपीचे विमानतळ लवकरच सुरु होईल. ते सुरु केल्यानंतर मी तुमच्या मागे लागणार आणि विकासासाठी दरवाजे उघडण्याचे आवाहन करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. माझा कोकण संपन्न झालाच पाहिजे, यासाठी जे जे करता येईल ते ते करण्याचे वचन भराडी देवीच्या साक्षीने माझ्या कोकणवासियांना माता भगिनींना देतो. कालच राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला विधीमंडळात सादर झाला कोरोनाने जगाची आर्थिक गाडी घसरली. पण या संकटकाळात आपल्या शेतकऱ्यांनी केवळ दोन घासच नाही दिले तर त्यांनी अर्थव्यवस्थेला बळ दिले. अर्थचक्राचा डोलारा सांभाळण्याचे काम केले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकरी वर्क फ्रॉम करू शकत नाही. उन वारा पाऊस, साथ काही ही येऊ दे त्याला शेतात जावे लागते. त्यांच्या या कष्टाबद्दल आणि सर्मपणाबद्दल मी शेतकऱ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो असेही मुख्यमंत्री म्हणाले. एक जिल्हा एक उत्पादन आणि त्याला बाजारपेठ मिळावी,  मालाचा दर्जा चांगला राहावा आणि त्याची अधिकाधिक निर्यात व्हावी, यासाठी शासनाने विकेल ते पिकेल योजना सुरु केल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत यांच्यासह इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तर विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी प्रास्ताविकामध्ये तीन ही पाटबंधारे योजनांची वैशिष्ट्ये, साठवण क्षमता आणि खर्च याची माहिती दिली.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी