शरद पवार (Sharad Pawar) गेली साठ वर्ष महाराष्ट्र आणि भारत देशाच्या राजकारणात नेहमीच महत्त्वपूर्ण आणि मध्यभागी असणारे नाव. महाराष्ट्राचे राजकारण तर त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. देशाच्या राजकारणात त्यांचे सात-आठ खासदार असतील परंतु त्यांचे महत्त्व सरकार स्थापन करण्यास लागणाऱ्या 372 खासदारांच्या बरोबरीच असतं. महाराष्ट्र वजा शरद पवार बाकी शून्य. इतकं शरद पवार नावाचं महात्म्य अजूनही शाबूत आहे.
साहेबांचं राजकारण कोणाला आवडो न आवडो . साहेबांशिवाय केंद्र आणि राज्यातील राजकारणातील सत्तेचं वर्तुळ पूर्ण होऊच शकत नाही .
एका व्यक्तीमध्ये कुठून येते एवढे सामर्थ्य ? कसं काय त्यांनी स्वतःला जाणीवपूर्वक घडवलं असेल ? काय कष्ट असतील त्यामागे ? आम्ही फक्त आजचे शरद पवार पाहतो .परंतु बारामती सारख्या एका लहानशा गावातून त्यांची झालेली सुरुवात आमच्या लक्षात येत नाही . घरात राजकारणापेक्षा समाजकारणच जास्त . कोणतेही पाठबळ नाही . सुरुवातीला कोणीही गुरु नाही . त्यावेळच्या काँग्रेस सारख्या मातब्बर पक्षात येणं आणि टिकून राहणं हीच मोठी सर्वात अवघड गोष्ट . एकापेक्षा एक दिग्गज नेते . त्यांच्या वर्तुळात शिरून त्यांना धोबीपछाड देऊन राज्याचा सर्वात लहान वयात मुख्यमंत्री होणे म्हणजे खायचे काम आहे का हो ? पुलोद सरकार चालवणं म्हणजे एक अग्निपरिक्षा होती . अग्नि परीक्षेत यशस्वी होणे ही त्यापेक्षा अवघड गोष्ट . परंतु पवार साहेबांनी अग्निपरीक्षा सहज दिली . फर्स्ट क्लास मध्ये पास झाले .
राजकारण करता करता साहित्य क्षेत्रातील त्यांची उठबस पु .ल . देशपांडे, कुसुमाग्रज , ना .धो .महानोर , विजय तेंडुलकर, दया पवार , लक्ष्मण माने आणि इतर , चित्रपट क्षेत्रातील जब्बार पटेल ,दाक्षिणात्य सुपरस्टार शिवाजी गणेशन , मोहन आगाशे , निळू फुले आणि इतर , क्रीडा क्षेत्रातील जागतिक दर्जाचे खेळाडू , क्रिकेट क्षेत्रातील मुंबई ,इंडिया आणि इंटरनॅशनल पातळीवरील संघटनांचे प्रमुख , खो-खो ,कबड्डी , कुस्ती आणि तर बरच काही . टाटा ,बजाज , किर्लोस्कर , अंबानी असे कित्येक अगणित उद्योगपती यांच्याशी घरोब्याचे संबंध , त्याचवेळी सहकार क्षेत्रात तितकाच आदरयुक्त दरारा , देशाच्या नकाशावरील सर्वोच्च टोक जम्मू-काश्मीरमधील फारूक अब्दुल्ला पासून ते थेट खाली दाक्षिणात्य जयललिता पर्यंत , ममता बॅनर्जी , लालूप्रसाद यादव , देवेगौडा आणि इतर वेगवेगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी त्यांचे वैयक्तिक घनिष्ठ संबंध , अतिउत्कृष्ट संघटन कौशल्य , शेकडो आय .ए .एस . ,आय .पी .एस .दर्जाचे मिळून जे प्रचंड प्रशासकीय कर्तुत्व तयार होईल त्या सगळ्यांचे सार म्हणजे शरद पवार . जागतिक पातळीवरील बिल क्लिंटन पासून मार्गारेट थॅचर पर्यंत सर्वांशी वैयक्तिक संबंध . कामाच्या रहाटगाडग्यात दिल्ली वरून फोन करून नातीची शाळेची बस आली का ? म्हणून मुंबईमध्ये घरी फोन करून विचारणारा एक प्रेमळ कुटुंबवत्सल आजोबा , पक्का राजकारणी , चाणक्याचा आजोबा शोभावा असा माणूस .
माझ्या दृष्टीने महाराष्ट्राप्रती साहेबांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी आजचा जो काही पुरोगामी महाराष्ट्र आहे तो केवळ साहेबांमुळेच . नाहीतर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश , बिहार कधीच झाला असता . मागच्या पाच वर्षातील महाराष्ट्र आपण अनुभवलाच आहे . मनुस्मृतीला धर्मग्रंथ प्रमाण मानून राज्य आणि देश चालावा अशी प्रबळ इच्छा असणाऱ्या शक्तीशी अर्धशतकापेक्षाही मोठा प्रदीर्घ काळ लढा देणे आणि महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात भक्कमपणे उभं राहणं हे कोणत्याही साध्या किंवा मध्यम दर्जाच्या राजकारण्याचं काम नाही . ज्या राजकारण्याचा दर्जा अतिशय उच्च दर्जाचा असतो त्यालाच ते जमू शकतं आणि तो दर्जा शरद पवार साहेब सोडले तर कमी राजकारण्यांमध्ये दिसतो .
मी पोलिस अधिकारी होतो . मी साहेबांचा ‘ वैयक्तिक सुरक्षा अधिकारी ‘ म्हणून ही काही काळ काम केले आहे . त्यामुळे त्यांना फारच जवळून पाहता आले . अजूनही वेगवेगळ्या कामानिमित्त झालेल्या भेटीत त्यांना पाहत असतो . एक जबरदस्त मेहनती , कष्टाळू , गाव ते देशपातळीवरील सामाजिक-राजकीय भान असणारा , अतिशय नम्र व्यक्ती . सकाळी सहा वाजता सार्वजनिक दिवस सुरू करून रात्री दहा अकरा वाजता तो दिवस संपविणारी व्यक्ती . सर्व क्षेत्रात अपडेट असणारा , प्रचंड ऊर्जा असणारा ऊर्जावान व्यक्ती , सतत कामात असणारा , प्रचंड मोठा ग्रंथप्रेमी , वाचक .
आमच्या ” मी बुद्धिस्ट फाउंडेशन ” तर्फे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ” महामानव ” नावाचा ग्रंथ तयार केला होता . त्या ग्रंथासाठी साहेबांनी एक माहितीपूर्ण लेख सुद्धा लिहिला होता . साहेबांनी त्या ग्रंथाच्या तीनशे पन्नास प्रती आपल्या ‘ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ‘ साठी विकत घेतल्या . त्यांच्या वैयक्तिक संग्रहासाठी सहा प्रती त्यांनी घेतल्या . एकाच पुस्तकाच्या सहा प्रती कशासाठी ? यासंदर्भात मी जेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांकडे चौकशी केली त्यावेळी त्यांनी जी माहिती दिली तेव्हा साहेबांच्या प्रति माझा आदरभाव आणखीनच वाढला . साहेब ज्यावेळी पुणे , बारामती ,मुंबई , दिल्ली अशा त्यांच्या निवासस्थानी असतात त्या त्या ठिकाणी या पुस्तकाची एक एक प्रत ठेवली जाते .उदाहरणार्थ साहेब मुंबईत असताना पुस्तक वाचत असताना ज्या पानावर मुंबईत वाचणे थांबविले असेल त्याचे पुढील पान ते दिल्लीत गेल्यावर वाचायला सुरुवात करतात . मला सांगा वाचनाचा इतका प्रचंड व्यासंग असलेला आजच्या तारखेला कोणता राजकीय नेता आहे ? साहेबांच्या प्रचंड यशात या वाचन वेडेपणाचा तर वाटा नसेल ?
साहेबांवर बरेच काही लिहिता येईल. पी.एच.डी.च्या दहा-बारा थिसिस यावर होतील इतकं मटेरियल हे या एकाच व्यक्तिमत्त्वात आहे .
साहेब मराठी माणूस म्हणून , एक पुणेकर म्हणून , एक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून , एक अतिशय जवळकीच , आपुलकीचं , प्रेमाचं , आणि आपला माणूस म्हणून आपल्याविषय प्रचंड प्रेम ,जिव्हाळा आम्हाला नेहमीच वाटत आला आहे .
साहेब , शतायुषी व्हा.
आपलाच निस्सीम चाहता ,
ऍड . विश्वास काश्यप ,
माजी पोलीस अधिकारी ,
पुणे – मुंबई .
गोदावरी नदीला येणाऱ्या पुराची तीव्रता कमी करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर पुलाखाली स्वयंचलित मॅकेनिकल गेट (Mechanical gates)…
जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील, तर 20 हजाराची लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…
केवळ "विश्वास" या साडेतीन शब्दावर गेली अनेक वर्षे ,रोज सकाळी घरासाठी दूध ( Milk) वापरणारे लाखो…
उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य…
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ( Narendra Modi) आरोप…
शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…