शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून वर्षातून दोनदा बोर्डाच्या परीक्षा (Board exams) घेण्यासाठी ‘लॉजिस्टिक्स्’वर काम करावे, यासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (सीबीएसई) विचारणा केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘सीबीएसई’ला दिलेल्या सूचनेवरून पुढील वर्षी म्हणजेच २०२५-२६ पासून वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा (Board exams) होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि ‘सीबीएसई’ यांच्यामार्फत पुढील महिन्यात मुख्याध्यापकांसमवेत वर्षातून दोनदा बोर्डाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सल्लामसलत करण्यात येणार आहे.(Board exams to be held twice a year)
नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (२०२०) अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सत्र अभ्यासक्रम पद्धतीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने आता लवकरच ‘सीबीएसई’मार्फत वर्षातून दोनदा बोर्डाच्या परीक्षा घेण्यासंदर्भातील आराखडा तयार करण्यात येणार आहे.पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होऊ न देता बोर्डाच्या दुसऱ्या परीक्षेला कसे सामावून घेता येईल, त्यासाठी शैक्षणिक दिनदर्शिकेची रचना कशी करावी, याची पद्धती तयार करण्याच्या प्रक्रियेवर सध्या ‘सीबीएसई’ काम करत आहे. वर्षातून दोनदा परीक्षा कशी घेता येईल, यावर ‘सीबीएसई’ने काम करावे, अशा सूचना शिक्षण मंत्रालयाने दिल्या आहेत. सत्र परीक्षा घेण्याचे कोणतेही नियोजन नाही.
बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल
१) ओपन बुक परीक्षा पद्धती : विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत पुस्तक घेऊन परीक्षा देता येईल. पण, परीक्षेतील प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त राहील. विद्यार्थ्यांना उत्तर पाहून लिहिताना स्वत:चा सविस्तर अभ्यास परीक्षेपूर्वी करावाच लागेल असा हा पॅटर्न असणार आहे.
२) सेमिस्टर पॅटर्न : दहावी व बारावीच्या परीक्षा आता वर्षातून एकदाच नव्हे तर दोन सेमिस्टरमध्ये होतील. पदवी, पदव्युत्तरच्या धर्तीवर भविष्यात दिवाळीपूर्वी एक तर उन्हाळ्यापूर्वी एक सेमिस्टर होईल. अजून त्यासंदर्भात काही निर्णय झाला नाही, पण भविष्यात काळानुसार हा बदल होवू शकतो.