लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय जनता पक्षाकडे पूर्ण बहुमत आहे. आमच्याकडे १७० आमदार भाजपकडे आहेत, असा दावा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. शेलार यांनी आज दिवसभरात एकूण तीन पत्रकार परिषदा घेतल्या. या तिन्ही पत्रकार परिषदांत त्यांनी वारंवार आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे.
विशेष म्हणजे, भाजपकडे अवघे १०५ आमदार आहेत. काही अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे भाजपचे संख्याबळ १२५ एवढे वाढले आहे. अजित पवारांमुळे त्यात आणखी ५ आमदारांची भर पडेल असे चित्र दिसत आहे. असे असताना १७० आमदारांचे संख्याबळ भाजपकडे कुठून येणार आहे या विषयी आता शंका निर्माण झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी भाजप सरसावली असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
आशिष शेलार यांनीही, आम्ही ‘ऑपरेशन देवेंद्र व अजित पवार’ सुरू केल्याचे सूचक विधान केले आहे. आज सगळे आमदार उपस्थित होते. आमदार सुरेश खाडे यांच्या भावाचे निधन झाले आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नाची तयारी चालू आहे. त्यामुळे ते उपस्थित नव्हते. अन्य चार आमदारांवर ‘ऑपरेशन’ची जबाबदारी आहे. त्यामुळे ते आले नव्हते, असे आशिष शेलार यांनी सांगितले.
आमदारांच्या बैठकीत ठरली रणनिती
भाजपच्या सगळ्या आमदारांची आज वसंतस्मृती येथे बैठक आयोजित केली होती. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव करण्याबाबतची रणनिती आणि चर्चा या बैठकीत करण्यात आली.. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आल्याचे शेलार यांनी सांगितले.
निवडणुकीच्या निकालात भाजप – शिवसेना महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाला होता. १८० च्या वर आमदार संख्या होती. पण शिवसेनेने जनादेशाचा अनादर व हेटाळणी केली. तीस वर्षांपासूनच्या हिंदूत्व विचारसरणीला तिलांजली दिली. परंतु अजितदादांच्या पाठिंब्याने आता सरकार स्थापन झाले आहे. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांबद्दल विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. दलित, कामगार, युवक, सर्व जाती घटकांना एकत्र नेऊन महाराष्ट्राच्या विकासाची गती हे सरकार वाढवेल असा दावाही शेलार यांनी केला.
हे सुद्धा वाचा
शरद पवारांनी अजित पवारांना फटकारले
अजित पवारांच्या नव्या दाव्याने खळबळ : मी राष्ट्रवादीतच, शरद पवार आपले नेते
चोरून केलेलं काम कोणतं, हे शिवसेनेनं आम्हाला शिकवू नये : आशिष शेलार