टीम लय भारी
मुंबई : साम, दाम, दंड व भेद या नितीचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा सपाटा भाजपने गेल्या काही वर्षांमध्ये लावला होता. पण महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येवून भाजपच्या या अघोरी इच्छेला वेसण घालण्यात यश मिळविले आहे. या तिन्ही पक्षांनी राज्यात एकत्र सत्ता स्थापन केली. त्यानंतर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही या तिन्ही पक्षांनी भाजपचा खूर्दा पाडला. आता आणखी एका महत्वाच्या निवडणुकीमध्ये ‘महाविकास आघाडी’तील हे तिन्ही पक्ष एकत्रित येत आहेत.
आशिया खंडात सर्वात मोठ्या असलेल्या ‘मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती’च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे सामोरे जाणार आहेत. तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बुधवारी बैठक घेऊन निवडणूक एकत्रितपणे लढण्याच्या निर्णय घेतला आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, आमदार संग्राम थोपटे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
‘महाविकास आघाडी’च्या उमेदवारांची यादी आज (गुरूवारी) जाहीर करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तिन्ही पक्ष एकत्रित आल्यामुळे निवडणुकीतील इच्छूक उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांनी सहकार्य करावे असे आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
‘मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती’ नवी मुंबईत कार्यरत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी गणेश नाईक यांचे आतापर्यंत वर्चस्व होते. गणेश नाईकांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे साहजिकच नाईक हे ‘मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती’ भाजपच्या दावणीला बांधण्याची तयारी करीत आहेत. नाईक यांचे हे मनसुबे उधळवून लावण्यासाठी ‘महाविकास आघाडी’च्या तिन्ही पक्षांनी कंबर कसली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या या बाजार समितीत प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते. राज्यातील व देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला कृषी माल या ठिकाणी आणत असतात. राज्यातील खेड्यापाड्यापासून ते जगातील प्रमुख देशांमध्ये या बाजार समितीचा व्यापर चालतो. त्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या या बाजार समितीवर वर्चस्व ठेवण्यासाठी सगळेच पक्ष आसुसलेले असतात. परिणामी या निवडणुकीसाठी ‘महाविकास आघाडी’नेही कंबर कसली आहे.
हे सुद्धा वाचा
VIDEO : मंत्री बच्चू कडूंनी मंत्रालयाच्या व्हरांड्यातच जनतेची ऐकली गाऱ्हाणी
मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अपंगांच्या बढतीसाठी प्रयत्न सुरू
बाळासाहेब थोरातांनी टाकलेला शब्द अजितदादांनी तात्काळ केला पूर्ण