टीम लय भारी
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मागील भाजप सरकारने धनगर समाजासाठी १ हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात त्यातील एक छदामही धनगरांच्या पदरात पडला नाही. पण विद्यमान महाविकास आघाडी सरकार येत्या आर्थिक वर्षात ८०० ते १ हजार कोटी रुपयांच्या योजना धनगर समाजासाठी कार्यान्वित करणार आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी आज याबाबत बैठक घेऊन तसा निर्णयच घेतला आहे.
मराठा आरक्षणासाठी मंत्रीमंडळ उपसमिती नेमण्यात आली आहे. त्याच पद्धतीने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सुद्धा उपसमिती नेमण्याचे आश्वासन अजितदादांनी यावेळी दिले. धनगर समाजाबद्दल मागील सरकारने ‘टाटा सामाजिक संस्थे’मार्फत (टीस) अहवाल तयार केला होता. अजितदादांनी हा अहवाल सुद्धा मागवून घेतला आहे.
अजितदादांसोबतच्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी आमदार व ओबीसी नेते प्रकाश शेंडगे तसेच वित्त विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. भरणे व शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यावेळी धनगर समाजाच्या विकासकामाच्या दृष्टीने अजितदादांकडे अनेक मागण्या केल्या. तब्बल एक तास यावेळी सखोल चर्चा झाली. मागील सरकारने १००० कोटी रूपयांची घोषणा केली होती. विद्यमान सरकारने त्यात आणखी १५०० कोटींची भर घालून एकूण २५०० कोटी रुपयांची धनगर समाजासाठी तरतूद करावी अशी मागणी केली. त्यावर धनगर समाजाला कमीत कमी १००० कोटी रुपयांची येत्या आर्थिक वर्षात नक्कीच तरतूद करेन असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
तरूणांना व्यवसायासाठी वसंतराव नाईक महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणे, तांडा व वाड्या विकास योजनेसाठी तरतूद करणे, सारथीप्रमाणे महाज्योती योजनेअंतर्गत ओबीसी व भटक्या विमुक्तांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे व इतर सुविधा पुरविणे, चौंडी येथील अहिल्यादेवी होळकरांच्या रखडलेल्या स्मारकाचा विकास मार्गी लावणे, बिरोबा देवस्थानचा विकास करणे, जेजुरी येथील होळकर वाडा व होळकर तलावाचा विकास करणे, ओबीसी व भटक्या विमुक्तांच्या रखडलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतीपूर्तीसाठी तरतूद करणे आदी मागण्या या शिष्टमंडळाने केल्या. या सगळ्या मागण्यांना अजितदादांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
शिष्टमंडळामध्ये शशिकांत तरंगे, हनुमंत चौरे, सचिन शेंडगे, बाळासाहेब करगळ, तानाजी सोनटक्के आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.
हे सुद्धा वाचा
भाजपने धनगरांच्या देवस्थानांचीही केली फसवणूक, आता राष्ट्रवादीचे दत्ता भरणे पाळणार शब्द
VIDEO : मराठ्यांप्रमाणे धनगरांनाही आरक्षण हवेच : उद्धव ठाकरे
वारसा हक्काने नोंद झालेली जमीन ब्राह्मण कुटुंबाने कसणाऱ्या धनगरांच्या नावे केली