टीम लय भारी
मुंबई : सध्या देशात आणि राज्यात कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातले आहे. त्यामुळे सध्या सर्व यंत्रणा ही कोरोनाशी दोन हात करण्यात व्यस्त आहे. मात्र, विरोधीपक्ष अतिशय खालच्या स्तरावर आणि बालिश राजकारण करत आहे, अशाने तुम्हाला लोकं दारात सुद्धा उभे करणार नाहीत, अशी प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आपल्या शैलीत भाजपवर सडकून टीका केली आहे.
भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची वारंवार भेट घेऊन राज्य सरकारच्या तक्रारीचा पाढा वाचला. इतकेच नव्हे तर सगळीकडे फिरुन भाजपमध्ये आलेल्या नारायण राणे (Narayan Rane) यांचाही टेकू घेण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपा नेत्यांनी केला आहे. नारायण राणे यांनी तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राज्यात कोरोनाचे संकट असताना भाजप नेत्यांकडून अशाप्रकारे अत्यंत घाणेरडे राजकारण केले जात आहे. राज्यात कोरोनामुळे अत्यंत वाईट अवस्था आहे. अशा परिस्थितीत राजकारण करणे अत्यंत चुकीचे आहे. याचा आम्ही निषेध करतो. सत्तेची इतकी लालसा असू नये, असा प्रहार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भाजपवर केला आहे.
सध्याच्या परिस्थितीत जनतेची काळजी घेणे गरजेचे आहे. पण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह भाजपचे नेते उठसूठ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत आहेत. मुळात राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. मात्र, विरोधी पक्ष त्यांना भाजप कार्यकर्ता असल्यासारखे वागणूक देत आहे. त्यामुळे हे राज्यासाठी अत्यंत घातक असल्याचे बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सांगितले.