जुही कोरे (Juhi Kore) नामक मराठमोळया तरूणीची लिंक्डइन अंकाउटची पोस्ट गेल्या काही दिवसांपासून वायरल झाली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या आजोबांनी शिक्षण घेण्यासाठी कशाप्रकारे संघर्ष केला आणि शिक्षण घेतल्यानंतर कशाप्रकारे सरकारी नोकरीमधील कामाने आपला ठसा उमटवला याचे वर्णन केले आहे. जुही कोरेने स्वत: ऑक्सफर्ड विदयापीठातून (Oxford University) तुलनात्मक सामाजिक राजकरण (Comparative Social Politics) याविषयामध्ये मास्टर्सची पदवी संपादन केली आहे. ती सध्या विश्व आर्थिक मंच (World Economic Forum) या नावाजलेल्या संस्थेमध्ये कार्यरत आहे. त्याशिवाय तिने टेडेक्स टॅाक (Tedex Talk) या जगप्रसिद्ध मंचावरून ‘सामाजिक उद्यमिता’ या विषयावर व्याख्यान दिले आहे.आपल्या लिंक्डइन पोस्टमध्ये जुहीने नमूद केले आहे की, तिच्या आजोबांचा महाराष्ट्रातील निम्न मध्यमवर्गातील एका दलित (Dalit) कुटुंबामध्ये जन्म झाला. त्यामुळे त्यांना लहान वयापासूनच शिक्षण घेण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला.
तिने पुढे असे नमूद केले की, भारताला १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार मिळाला नाही. माझे आजोबांचे शिक्षण घेण्याचे वय असतानासुद्धा त्यांचे कुटुंबीय त्यांना शिक्षण घेण्यास विरोध करत होते. ते चार भावंडामध्ये सर्वात मोठे असल्याने त्यांच्या कुटुंबाकडून त्यांना शेतामध्ये काम करण्यास सांगितले गेले. त्यांच्या कुटुंबाला ही सुद्धा भीती होती की, शाळेतील शिक्षक आणि तेथील विदयार्थ्यांचे त्यांच्याप्रती वर्तन कसे असेल.
जुहीच्या आजोबांनी त्यांच्या आई-वडिलांना हे सांगितले की, ते पहाटे तीन वाजल्यापासून शेतात काम करतील आणि त्यानंतर शाळेत जातील. ते पहाटेपासून शेतात काम करुन सुद्धा नंतर त्यांना शिक्षकांकडून वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करण्यास सांगितले जात असे.
जुहीने पुढे असे नमूद केले की, तिच्या आजोबांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ते त्यांच्याच जातीच्या (दलित) वयाने मोठया असलेल्या मुलांकडून पुस्तके घेऊन अभ्यास करत होते. अत्यंत हालाखीची परिस्थिती आणि तेव्हाच्या काळात शाळेत जातिभेद असूनसुद्धा त्यांनी त्यांच्या वर्गातील इतर उच्च जातीच्या विदयार्थ्यांपेक्षा जास्त गुण मिळवले.
जुहीने पुढे असे लिहीले की, तिच्या आजोबांच्या शाळेतील मुख्याधापकांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांना मुंबई सारख्या शहरात राहण्याचा आणि महाविदयालयीन शिक्षणाचा खर्च उचलला.
त्यांनी मुंबईमध्ये राहून कायदयाची पदवी घेतली आणि स्वत:चा खर्च भागविण्यासाठी त्यांनी पूर्णवेळ सफाई कर्मचाऱ्याची नोकरी केली. त्यानंतर काही वर्षांनी त्याच कार्यालयात त्यांनी उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याची भूमिका पार पाडली.
जुही आपल्या आजोबांबदद्ल आपल्या भावना व्यक्त करताना लिहीले की, मला त्यांचा सार्थ अभिमान आहे कारण त्यांनी शिक्षणाचे महत्त्व आमच्या कुटुंबामध्ये रूजवले. त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे मी ऑक्सफर्ड विदयापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले.
हे सुद्धा वाचा –
iPhone 14 launch : नव्या आयफोनचे देखणे रुप पाहिले का?
Yavatmal News : अरेरे! डोक्यावर मृतदेह घेतला, अन् गळ्याएवढ्या पाण्यातून नदी ओलांडली
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात अतिरेक्याची समाधी…
जुहीने सांगितले की, जेव्हा तिची ऑक्सफर्ड विदयापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी निवड झाली तेव्हा तिने तिच्या आजोबांना दूरध्वनीद्वारे संवाद साधला. तेव्हा तिच्या आजोबांना खूप आनंद झाला आणि त्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांना, फळविक्रेता, भाजीविक्रेत्यांना ही चांगली बातमी सांगितली.
दुर्दैवाने एका वर्षाआधी जुहीच्या आजोबांचे निधन झाले त्यामुळे ते तिच्या ऑक्सफर्ड विदयापीठातील दीक्षांत समारोहाला हजर राहू शकले नाही. परंतु जुहीला अशी खात्री आहे ही तिच्या आजोबांचा आशिर्वाद सदैव तिच्या पाठीशी असेल.
महाराष्ट्रातील एका दलित व्यक्तीने शिक्षणाचे महत्त्व समजून, त्यासाठी काबाडकष्ट करून सामाजिक जीवनात आपला ठसा उमटविला आणि आपल्या भावी पिढीला प्रेरणा दिली. त्यामुळे त्यांच्या नातीनेसुद्धा जगातील एका उत्तम विदयापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले ही नक्कीच कौतुकाची बाब आहे.