34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रगिरीश महाजन यांची आर्थिक नाकाबंदी!

गिरीश महाजन यांची आर्थिक नाकाबंदी!

टीम लय भारी

जळगाव : ‘तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढू’ असा इशारा देऊन २४ तास उलटत नाहीत तोच ठाकरे सरकारने आर्थिक गुन्हे शाखेकडून माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची आर्थिक नाकाबंदी करुन भाजपला सडेतोड उत्तर दिले आहे. ‘तुमची ईडी तर आमची सीडी’ असा इशाराच एकनाथ खडसेंनी भाजप नेत्यांना पक्ष सोडताना दिला होता. त्यामुळे या सगळ्या कारवाईमागे खडसे असल्याची चर्चा असून, राज्य सरकारला भ्रष्टाचाराची कागदपत्रे पुरवून फडणवीस आणि महाजन यांना कोंडीत पकडत असल्याची चर्चा आता जळगावमध्ये सुरू झाली आहे.

केंद्रातील भाजप सरकारने शिवसेना आमदार प्रताप नाईक यांच्यावर ईडीची कारवाई करून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. याला प्रत्त्युत्तर म्हणून भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजनांचे उजवे हात समजले जाणारे जळगाव येथील सुनील झंवर या व्यावसायिकावर बीएचआर सोसायटी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने छापेमारी केल्याचा योगायोग जुळून आला आहे. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाला महिनाही होत नाही तोच महाजनांच्या खंद्या समर्थकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागल्याने सरकारकडून महाजनांची नाकाबंदी सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बेनामी मालमत्तेच्या ठेवींप्रकरणी चौकशीच्या रडारवर असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी अर्थात ‘बीएचआर’शी निगडित जळगावात पाच ठिकाणी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या १३५ अधिकारी, कर्मचा-यांच्या पथकाने छापे टाकले. माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत सावलीप्रमाणे वावरणारे सुनील झंवर यांच्या विविध फार्मवरदेखील छापे टाकल्याने ही कारवाई राजकीय वर्तुळात महत्त्वाची मानली जात आहे.

दीड हजार कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात ठेवीदारांची रक्कम परत देण्यासाठी जितेंद्र कंडारे यांची अवसायक म्हणून नेमणूक करण्यात आली. मात्र, कंडारे यांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांना हाताशी धरून कर्जदारांच्या जमिनी, तसेच स्थावर मालमत्ता कवडीमोल भावात विकल्याचा आरोप आहे. ठेवींच्या रकमा मॅचिंग करण्यासह तडजोडीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार अवसायकांमार्फत करण्यात आले. मात्र, ठराविक व्यक्तींनी या जमिनी, तसेच स्थावर मालमत्ता मातीमोल भावात खरेदी केल्या. यात झंवर यांचे नाव अग्रस्थानी आहे. झंवर आणि गिरीश महाजन यांचे सौहार्द संबंध सर्वश्रुत आहेत.

झंवर यांच्या व्यवहारांचे नाशिक कनेक्शनही चर्चेत आहे. नाशिकमधील भाजपच्या अनेक पदाधिका-यांसोबत त्यांची नेहमीच ऊठबस आहे. महापालिकेतील अनेक ठेक्यांमध्येही झंवर यांची पार्टनरशिप असल्याची भाजपमध्येच चर्चा आहे. त्यामुळे झंवर यांच्या नाशिक कनेक्शनमुळे अनेक पदाधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता आहे. नाशिकमधील महाजनांची सावली असलेल्या बोरानामक व्यक्तीसोबतच अनेक कंत्राटामंध्ये ते भागीदार असल्याची चर्चा असल्याने या चौकशीचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

महाजन यांच्या आरोग्य शिबिरांसह अन्य कार्यक्रमांना झंवर यांच्या संस्थेचेच ‘फंडिंग’ असते. त्यामुळे झंवर यांच्यावर झालेली कारवाई ही अप्रत्यक्ष महाजन यांच्यावरच निशाणा साधण्याचा प्रकार समजला जात आहे.

महाजन समर्थक असलेल्या झंवर यांच्यावर एकनाथ खडसेंनी शालेय पोषण आहार घोटाळ्यात यापूर्वी अनेक वेळा गंभीर आरोप केले आहेत. विधानसभेत पुराव्यानिशी आरोप करूनही भाजप सरकारच्या काळात झंवर यांच्यावर कारवाई झालेली नव्हती. झंवर यांना महाजनांचे कृपाछत्र मिळाल्याने त्यांच्यावर भाजप सरकारच्या काळात कारवाई झालेली नाही. गेल्या महिन्यातच खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करीत, महाजनांचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होता. महाजन यांची आर्थिक शक्ती असलेल्या झंवर यांच्यावर बीएचआर प्रकरणी कारवाई करून महाजनांना अप्रत्यक्षपणे इशारा देण्यात आल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी