सुरेश डुबल : टीम लय भारी
कराड : महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून होत असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. असे असले तरी भाजपला जे अपेक्षित आहे ते कधीही साध्य होणार नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींविषयी आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आपली भूमिका मांडली. त्यावेळी आ. चव्हाण यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सध्याच्या काळात सुरू असलेल्या भुमिकेबाबत शंका व्यक्त केली. जगासह देशात राज्यात कोरोनाचा संकट आले आहे. सध्या राज्यातील स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहे. मात्र याच कोरोनाच्या काळातील स्थिती सावरण्यासाठी सरकारला पाठिंबा देण्याचे सोडून भाजप त्याचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करत आहे. महापुर आला त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुराचे राजकारण करु नका, असे आवाहन केले होते. मात्र आता तेच राजकारण करण्यात गुंतले आहेत.
कोरोनाच्या या स्थितीत ते करत असलेले राजकारण हे वाईट आहे. आता ही राजकारण करण्याची वेळ नाही. मात्र त्यांना राज्यपालांची साथ आहे, असा ठाम दावा पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला. आत्ता सुरू असलेले राजकारण हे राज्याला सावरण्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे भाजपने ते बंद केले पाहिजे. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदाराबाबत जी भूमिका घेतली ती ही शंकास्पद आहे, असे ते म्हणाले.