31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्र'या' कारणामुळे अनिल देशमुखांचीही उचलबांगडी होण्याची शक्यता!

‘या’ कारणामुळे अनिल देशमुखांचीही उचलबांगडी होण्याची शक्यता!

टीम लय भारी

मुंबई :- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदलीनंतर आता थेट  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच टांगती तलवार आहे. अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन हटवण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांना एनआयएने अटक केल्यानंतर मोठमोठे खुलासे होत आहेत. त्यामुळे गृहखाते बदनाम होत असल्याची भावना आहे. त्यामुळेच अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावर हटवण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांनी आज दिल्लीत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

शरद पवारांच्या भेटीत नेमके काय झाले हे अनिल देशमुखांनी पत्रकारांना सांगितले. देशमुख म्हणाले, ” आज मी सकाळी दिल्लीत आलो होतो. नागपुरातील मिहान प्रकल्प आहे. त्यामध्ये मोठ्या इंडस्ट्रींचा येण्याचा विचार आहे. त्यामुळे आमच्या विदर्भात येण्याचा विचार आहे. या इंडस्ट्री तिकडे आल्या पाहिजेत, यासाठी पवार साहेबांची मदत घेण्यासाठी आलो होतो. पवार साहेबांना मिहान प्रकल्पाचे डिटेल्स दिले. त्यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा करत असताना, पवार साहेबांना साहजिकच मुंबईतील मुकेश अंबानीच्या घरासमोरील स्फोटकांची माहिती घेतली. एनआयए आणि एटीएस सर्व तपास करत आहेत. त्यांना सर्व मदत राज्य शासनाची आहे. जो दोषी असेल त्यावर कारवाई होईल. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई राज्य शासन करेल.”

अनिल देशमुखांवर टांगती तलवार

एकीकडे अनिल देशमुख मिहान प्रकल्पाबाबत जरी सांगत असले तरी, खुद्द शरद पवारांच्या भेटीसाठी ते दिल्लीत पोहोचले, यावरुन सध्याच्या राजकीय घडामोडींचा अंदाज येऊ शकतो. सचिन वाझेप्रकरणात गृहखातं बदनाम झालं आहे. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पदावरुन हटवण्यात आले. त्यानंतर आता अनिल देशमुख यांच्यावरच टांगती तलवार आहे.

शरद पवार नाराज?

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुखांच्या गृहखात्याच्या कारभारावर शरद पवार नाराज आहेत. अनिल देशमुखांचा खात्यावर वचक नाही, ते गृहखाते हाताळू शकत नाहीत, अशी भावना आहे. त्यामुळे शरद पवारांनी अनिल देशमुखांना दिल्लीत पाचारण केल्याचे सांगण्यात येत आहेत.

तीन कारणांमुळे अनिल देशमुख बॅकफूटवर

मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात ठाकरे सरकार बॅकफूटवर असले तरी गृहखाते बदनामीच्या केंद्रस्थानी आहे. सचिन वाझे यांना शिवसेना वाचवत असल्याचा आरोप होत आहे. मात्र गृहखाते हे राष्ट्रवादीकडे असल्याने या खात्याकडेही बोट दाखवले जात आहे.

सचिन वाझे यांचे नाव स्फोटक प्रकरणात आल्याने, गृहखात्यावर अनिल देशमुख यांचा वचक नसल्याची भावना शरद पवारांची आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. हे पहिले कारण आहे, ज्यामुळे अनिल देशमुखांवर टांगती तलवार आहे. दुसरे म्हणजे मुंबई पोलीस, सचिन वाझे याप्रकरणात गृहखाते बदनाम झाले आहे. त्याशिवाय तिसरे आणि महत्त्वाचे म्हणजे अनिल देशमुख यांचे मनोधैर्य खचल्याचे दिसत असल्याने, मुख्यमंत्रिपदानंतर सर्वात महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या खात्याचा कारभार, त्यांच्याकडे देणे योग्य नाही, त्यामुळे त्यांना हटवून गृहखात्याचा अनुभव असलेल्या जयंत पाटील यांच्या हे खाते सोपवले जाऊ शकते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी