टीम लय भारी
मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल (दि. २९ जुलै २०२२) अंधेरी येथील एका कर्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा हे सुद्धा उपस्थित होते. याचवेळी राज्यपाल कोश्यारी यांनी गुजराती आणि मारवाडी समाजामुळे मुंबईला आर्थिक राजधानी म्हणून ओळख मिळाली असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय पुढाऱ्यांसोबतच सामान्य नागरिकांनी सुद्धा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा निषेध करत खरपूस समाचार घेतला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या या वक्तव्याबाबत सर्वांनी नाराजी व्यक्त केली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्यपालांना खडेबोल सुनावले आहेत. ट्विटरवरून जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. इतकेच नाही तर त्यांनी राज्यपालांना ज्या राज्याविषयी प्रेम आहे त्या राज्यात जाऊन राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. दिल्लीतील बॉसला खुश करण्यासाठी महामहिम पदावरील व्यक्ती काहीही बोलत असल्याचा टोला सुद्धा यावेळी जयंत पाटील यांनी लगावला.
घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी जपून बोलण्याचा संकेत देशातील सार्वजनिक जीवनात आहे.मात्र,काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे. परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 30, 2022
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कायमच आपली बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. त्यांच्या या वक्तव्यांमुळे अनेकदा वाद देखील झाले आहेत. पण या वक्तव्यामुळे समस्त मराठी जणांच्या भावना दुखावल्या आहेत. दरम्यान, राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे जयंत पाटील चांगलेच संतापले आहेत. भाजपला राज्यपालांचे हे वक्तव्य मान्य आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे.
दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावे. महाराष्ट्राच्या राजधानीत पंचतारांकित व्यवस्थेत राहून महाराष्ट्रातील मराठी माणसांचा अपमान मा. राज्यपाल महोदय करत आहेत.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 30, 2022
राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांसह शिंदे गटाने सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. पण भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मात्र राज्यपालांची पाठराखण केली आहे. राज्यपालांनी कोणाच्याही भावना दुखावला नसल्याचे मत नितेश राणेंनी व्यक्त केले आहे. यामुळे ट्विटरवर आणि सोशल मीडियावर चांगलेच वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र भाजपाला राज्यपालांचे हे विधान मान्य आहे का ? राज्यपाल महोदय मराठी माणूस, महाराष्ट्राचा गौरवशाली व जाज्वल्य इतिहास यांचा वारंवार अपमान का करत आहेत ?
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 30, 2022
हे सुद्धा वाचा :
विद्यमान संकटातूनच उद्धव ठाकरे शिवसेनेला मजबूत करतील
अख्खं गाव चार दिवस पाण्यात; अजित पवारांनी घरात जाऊन अश्रू पुसण्याचा केला प्रयत्न !
काय ते मुख्यमंत्री.. काय ते उपमुख्यमंत्री..सगळं ओक्के मध्ये नाहीये, आंबादास दानवेंचा हल्लाबोल