टीम लय भारी
मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभागात काल मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. राज्यात १२५०० पोलिसांची भरती करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.
पहिल्या टप्प्यात 5300 पोलिसांच्या भरती प्रक्रिया सुरू
राज्यात पहिल्यांदाच १२५०० पोलीस भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, कोरोनामुळे त्यावर थोडा परिणाम झाला, पण पहिल्या टप्प्यात ५३०० पोलिसांच्या भरती प्रक्रिया सुरू झाली. पहिल्यांदा राज्याची आर्थिक परिस्थिती खराब असताना १२५०० पोलिसांना सेवेत घेण्याचा अतिशय मोठा निर्णय घेण्यात आल्याचे ही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधोरेखित केले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचंही मान्य
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अंबानी स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील तपासात पोलीस अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचे ही मान्य केले आहे. आमच्या अधिकार्यांकडून गंभीर चुका झाल्यात. एटीएस आणि एनआयएकडून याचा तपास सुरू आहे. चौकशीतून जे समोर येईल त्यानुसार जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल. विरोधी पक्षनेते सगळीकडून माहिती घेत असतात, गटबाजी प्रत्येक ठिकाणी असते, असे ही अनिल देशमुख यांनी सांगितले.
चौकशीत बाधा येऊ नये म्हणून अधिकाऱ्यांच्या बदल्या
काल जी बदली केली, चौकशीतून काही गोष्टी समोर आल्या, त्या माफ करण्यासारख्या नाहीत, त्यामुळे चौकशीत बाधा येऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर बसून आम्ही आयुक्त बदलण्याचा निर्णय घेतला. आयुक्तालयातील सहका-यांच्या माध्यमातून ज्या चुका झाल्या म्हणून ही बदली करण्यात आली, असे ही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. NIA आणि ATS च्या तपासात काही बाबी आढळल्या आहेत. परमबीर सिंग यांच्या कार्यालयाकडून काही गंभीर चुका झाल्या आहेत, त्या माफ होण्यासारख्या नसल्याचे ही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.