टीम लय भारी
मुंबई : गेल्या काही वर्षापासून बुलेट ट्रेनवरून गोंधळ सुरु आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वकांशी प्रकल्पांपैकी मुंबई- सूरत बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. परंतु त्या प्रकल्पाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा करार अयोग्य वाटल्यास तो महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून रद्द करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची विशेष मुलाखत घेतली. याच मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी बुलेट ट्रेनसंदर्भात पहिल्यांदाच थेटपणे आपली भूमिका मांडली. प्रकल्पासंदर्भात एकतर्फी भूमिका घेण्यात आली असेल तर ती योग्य नसून हा बुलेट ट्रेन प्रकल्पाचा करार अयोग्य वाटल्यास तो महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून रद्द करण्यात येईल असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. प्रकल्पाच्या भूसंपादनाला विरोध करणाऱ्यांच्या पाठिशी शिवसेना उभी आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडी विरुध्द मोदी सरकार असा जोरदार सामना रंगण्याची शक्यता आहे.