राज्यातील सत्तासंघर्ष चांगलाच पेटल्याचे दिसून येत आहे. प्रत्येकच पक्ष आपापली बाजू आणखी मजबूत करण्याच्या मागे लागला आहे. भाजपने तर आता रौद्ररुप धारण केले असून प्रादेशिक पक्षच संपवण्याच्या उद्धेशाने ऑपरेशन लोटस सर्वदूर राबवण्यास सुरुवात केली आहे. भाजपने पुन्हा एकदा सेनेला लक्ष करत आता कोकणात सुद्धा धक्कातंत्र सुरू केले आहे. रायगड जिल्ह्यातील माजी आमदार आणि शिवसेनेचे युवा नेते अवधूत तटकरे हे शिवसेनेला डच्चू देत भाजपमध्ये आज प्रवेश करणार असल्याच्या उलट सूलट बातम्या सुरू झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोकणात कमळ आपले स्थान मजबूत करत असल्याने राष्ट्रवादी सुद्धा चिंतेत पडले आहेत.
रायगड जिल्ह्यातील रोहा-श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेनेचे युवा नेते अवधूत तटकरे (Avadhut Tatkare) हे भगवा शिवसेना सोडून आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. तटकरे यांच्या भाजपगोटात सामील होण्याने रोहा तालुक्यातील शिवसेनेला जबर फटका बसण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. अवधूत तटकरे यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, आमदार आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर, रवींद्र पाटील, महेश बालदी हे उपस्थित राहणार आहेत.
हे सुद्धा वाचा
Eknath Khadse : खडसेंचा ठिय्या, बिघडलेली तब्येत अन् राष्ट्रवादीचे आंदोलन, पाहा नक्की काय झालं
अवधूत तटकरे यांनी कमळाला जवळ केल्यामुळे केवळ शिवसेनेलाच नव्हे तर रायगडातील राष्ट्रवादीचा चेहरा तटकरे यांना सुद्धा धक्का बसणार आहे. तटकरे कुटुंबियांमध्ये पक्ष वेगवेगळे पाहायला मिळत असले तरीही महाविकास आघाडीच्या निमित्ताने सगळेच एकत्रितपणे काम करताना दिसून येत होते. परंतु आता अवधून तटकरे भाजपमध्ये गेल्यामुळे तटकरे तटकरे एकमेकांसमोर विरोधक सत्ताधारी म्हणून उभे राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अवधूत तटकरे यांची राजकीय सुरवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासुन झाली. अनिल तटकरेंचे चिरंजीव, तसेच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे सख्खे पुतणे म्हणुन पण त्यांची ओळख आहे. अवधूत हे बारा वर्ष रोहा नगरपालिकेचे नगराध्यक्षपदी होते. 2014 ते 2019 या कार्यकाळात त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघाचं नेतृत्व केलं. पुढील काही वेळ त्यांनी राजकारणातून विश्रांती घेतली आणि त्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची हात मिळवणी झाल्यामुळे अवधूत नाराज होते. पण शेवटी त्यांनी भाजपाला साथ देत राजकाणात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.