टीम लय भारी
मुंबई : विविध अभ्यासक्रमांची रचना तयार करण्यासाठी विद्यापीठांमध्ये अभ्यास मंडळे असतात. या अभ्यास मंडळांवर विषयानुरूप तज्ज्ञांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे अभ्यास मंडळांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना शक्यतो स्थान मिळत नाही. पण अभ्यासू वृत्ती असलेल्या राज्य सरकारमधील एका अधिकाऱ्याला मुंबई विद्यापीठाने सन्मानाने ‘ग्रामीण विकास’ या विषयाच्या अभ्यास मंडळावर ‘स्वीकृत सदस्य’ म्हणून नियुक्त केले आहे.
बिपीन जगताप असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. राज्याच्या ‘खादी व ग्रामोद्योग मंडळा’चे ते उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी महाबळेश्वर येथील ‘मध संचालनालया’चे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. अधिकारी म्हणून जगताप यांनी ग्रामीण विषयामध्ये प्रचंड कार्य केले आहे. मध निर्मितीच्या माध्यमातून शेतकरी, तरूण, महिला यांना रोजगाराच्या अफाट संधी उपलब्ध आहेत. याबाबत त्यांनी अधिकारपदावर राहून बरेच कार्य केले आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक तरूणांनी मधपाशी पालन करून मोठे व्यावसाय स्थापन केले आहेत.
मध गोळा करण्यासाठी मधमाशी शेतात सतत फिरत असते. त्यातून पिकांचे परागीकरण होते. अन् त्यामुळे त्या शेताचे उत्पन्न 30 टक्क्यांनी वाढते. मधमाशी पालनातून मधाला दूध, तूप किंवा अन्य कोणत्याही शेत उत्पादनापेक्षा जास्त दर मिळतो, हे जगताप यांनी दाखवून दिले. त्या अनुषंगाने त्यांनी ग्रामीण भागात मोठे कार्य केले आहे. ग्रामीण भागाशी निगडीत या विषयामधील जगताप यांचे प्रावीण्य लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने सन 2022 पर्यंत त्यांची अभ्यास मंडळावर नियुक्ती केली आहे.
जगताप यांच्यामुळे मुंबई विद्यापीठाला ग्रामीण विकास अभ्यासक्रम अधिक बळकट करता येईल अशी विद्यापीठांतील सूत्रांनी आशा व्यक्त केली आहे.
हे सुद्धा वाचा
तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, श्वेता सिंघल यांची फेरबदली
आश्विन मुद्गल, श्वेता सिंघल, सुनील चव्हाण यांच्यासह आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या