पीडब्ल्यूडी म्हटले की नजरेसमोर धूळ, फायली, पैसे आणि डर्टी गेम हे चित्र उभे राहते. महाराष्ट्रातील जनतेची पीडब्ल्यूडीविषयी ही मानसिकता तयार झालेली आहे. एखादा स्कूटरवाला रस्त्याने जात असताना खड्ड्यात पडतो. तो आपल्या विभागावर टीका करतो. अशा सामान्य लोकांना टीका करण्याची संधी आपण देतो. चुकीच्या मार्गांचा अवलंब करणारे अधिकारी मोठ्या पदांवर जात आहेत. गुणवत्ता असलेले अधिकारी मागे राहत आहेत. हे बदलायला हवे. देशाचे हित पाहायला हवे. चांगले बदल करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला या खात्याचे मंत्री बनविले आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
भारतरत्न मोक्षगुंडम विश्वसरैया यांची जयंती राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणून साजरी केली जाते. त्या निमित्ताने पीडब्ल्यूडीच्या राज्यभरातील सर्व अभियंत्यांची कार्यशाळा आज षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी अभियंत्यांसोबत संवाद साधताना रवींद्र चव्हाण यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी त्यांच्या हस्ते ६५ अभियंत्यांचा गौरव करण्यात आला.अधिकाऱ्यांनी मेरीटनुसार खूर्चीत बसले पाहीजे. आमिष दाखवून पुढे येण्यासाठी काहीजण प्रयत्न करीत असतात. मला अशा बाबींची लालसा नाही.
विशिष्ट पदे व विभाग मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागलेली दिसत आहे. ही स्पर्धा बंद करा, अशा शब्दांत चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. मलईदार पदे मिळविण्यासाठी पीडब्ल्यूडीमधील अधिकारी वाट्टेल तेवढी किंमत मोजायला तयार असतात. आतापर्यंत बहुतांश मंत्र्यांनी अशा अधिकाऱ्यांना जोपासण्याचे काम केले आहे. या पार्श्वभूमीवर रवीद्र चव्हाण यांनी अशा घोटाळेबाज व संधीसाधू अधिकाऱ्यांना इशारा दिल्याचे बोलले जात आहे. उल्लेख न करताच ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ असा संदेशच आपल्या भाषणातून दिल्याचे दिसत आहे.
रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, अभियंत्यांनी प्रत्येक कामामध्ये सकारात्मकता आणली पाहीजे. नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहीजे. जनतेला उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रयत्नशिल राहिले पाहीजे. आपल्या कामाचा पगार मिळतोच. पण समाधान सुद्धा मिळाले पाहीजे. त्यासाठी सर्वोत्कृष्ट कामाचा संकल्प करा. राज्याला व देशाला प्रगतीसाठी नेण्यासाठी प्रयत्न करा. कामामध्ये पारदर्शकता आणा, अशा सूचना चव्हाण यांनी केल्या. ते पुढे म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागासमोर अनेक आव्हाने आहेत.
हे सुद्धा वाचा
Eknath Shinde : मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा मुंबईकरांसाठी मोठा निर्णय !
Eknath Shinde : एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणविसांच्या कार्यालयाबाहेर ‘ED’ चा फलक
Narayan Rane : नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना सांगितला प्रगतीचा मंत्र
आपल्या विभागाकडून जनतेच्याही खूप अपेक्षा आहेत त्या पूर्ण क्षमतेने परिपूर्ण करण्यासाठी काम करा. आपापल्या कामामध्ये सकारात्मकता आणा. कोणताही रस्ता अथवा बांधकाम करताना ते दर्जेदार व उत्कृष्टपणे निर्माण करा.
देश घडविण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. त्यादृष्टीने विभागाने आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करुन पावले उचलण्याची गरज आहे. विभागाला सध्या निधीची कमतरता आहे.
तरीही कमी निधीमध्ये आवश्यक पण दर्जेदार स्वरुपाची कामे करण्याची मानसिकता आपण ठेवली पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आपल्या विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी आगामी काळात आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून सर्वांच्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल. आपली कामे हे पूर्ण क्षमतेने करा. कोणीही आपल्या विभागाविषयी तक्रार करता कामा नये याची प्रत्येकाने दक्षता घ्यायला हवी. मी माझ्या विभागाच्या कामामध्ये उत्कृष्ट सेवा देणार असे जर सर्वांनीच ठरवले तर येणा-या काळात आपला महाराष्ट्र राज्य नक्कीच प्रगतीपथावर जाईल असा विश्वासही मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.
सन २०१३ ते २०१९ पर्यंत उत्कृष्ट अभियंत्यांच्या पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे
वर्ष २०१३-१४
तत्कालीन कार्यकारी अभियंता साहेबराव सुरवसें, कार्यकारी अभियंता बी.एन. बहिर, तत्कालीन उप अभियंता लक्ष्मीकांत जाधव, उप अभियंता प्रदीप दळवी, सहाय्यक अभियंता श्रीमती रिता शुक्ला, कनिष्ठ अभियंता सुरेश जोशी, कनिष्ठ अभियंता संदीप चाफले, तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञ मिथिला जाधव, अंजली माटोडकर.
वर्ष २०१४-१५
तत्कालीन अधीक्षक अभियंता खंडेराव पाटील, कार्यकारी अभियंता विजय कारंडे, कार्यकारी अभियंता संजय मुनगिलवार, कार्यकारी अभियंता अनिल लक्ष्मण पवार, उप अभियंता श्रीकांत ढगे, उप अभियंता अनील निमकर, तत्कालीन उप अभियंता अस्मिता खोंडे, कनिष्ठ अभियंता समीर राऊळ, सहा.अभियंता श्रेणी-2 राहुल कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता मोहन महाडीक, तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञ श्रीमती यशोधरा देशपांडे.
वर्ष २०१५-१६
तत्कालीन अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड, कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, कार्यकारी अभियंता पोपट वाघमारे, उप अभियंता अजय भोसले, उप अभियंता संदीप कोटलवार, उप अभियंता कृष्णा वाघ, कनिष्ठ अभियंता शिवानंद बिराजदार, कनिष्ठ अभियंता संजय सोमाण, कनिष्ठ अभियंता (विद्युत) इशांत प्रकाश कुलकर्णी, तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञ संजय गेडाम, वास्तुशास्त्रज्ञ हर्षद साळुंके.
वर्ष २०१६-१७
अधीक्षक अभियंता शामकांत पाटील, तत्कालीन कार्यकारी अभियंता नारायण वेदपाठक, कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी, उप अभियंता सच्चिदानंद श्रावणी (अमरावती), उप अभियंता गणेश पाटील (नाशिक),उप अभियंता (विद्युत) संभाजी घोरपडे, कनिष्ठ अभियंता जितेंद्र नेहेते, कनिष्ठ अभियंता आनंद नागरे, सहाय्यक अभियंता श्रीकांत गुलकोटवार, वास्तुशास्त्रज्ञ शिल्पा कडू, सतिश पाटील.
सन २०१७-१८
अधीक्षक अभियंता सुनिल देशमुख, तत्कालीन कार्यकारी अभियंता सुषमा साखरवाडे,तत्कालीन कार्यकारी अभियंता जयंत कुलकर्णी, उप अभियंता ललिता गिरीबुवा, उप अभियंता सत्यशील नगराळे, उप अभियंता सुग्रीव गंगाधर केंद्रे, उप अभियंता संजीवनी करले, कनिष्ठ अभियंता बाबू शिंदे, कनिष्ठ अभियंता सुभाष बल्लाळ.
सन २०१८-१९
अधीक्षक अभियंता विकास रामगुडे, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, कार्यकारी अभियंता सचिन चिवटे, कार्यकारी अभियंता गजानन टाके, उप अभियंता रश्मी डोळे,कनिष्ठ अभियंता जितेंद्र काळे, कनिष्ठ अभियंता अतुल मुंडे, कनिष्ठ अभियंता (विद्युत) तानाजी थोपटे, पंकज पाटील, योगिता सोडल, दिपाली पवार, आर. बी. राजगुरु.