मुंबई – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai–Bengaluru National Highway) पुण्यातील चांदणी चौकातील पुलामुळे येथे वाहतूककोंडीची समस्या होत होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने अखेर गेल्या आठवड्यात हा पुल पाडण्यात आला. या ठिकाणी आता नवीन पूल उभारण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जुन्या पुलाच्या ठिकाणी साताऱ्याकडून-मुंबईकडे जाणाऱ्या तीन लेन व मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या साडे चार लेन उपलब्ध करून देण्यात आल्या असून चांदणी चौक भागातील वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी कमी झाली आहे. या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात येणार असून त्याचे काम देखील हाती घेण्यात आले आहे.
मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यासाठी व नवीन पुलाच्या कामासाठी खडक फोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आजपासून ( १० ऑक्टोबर) काम पूर्ण होईपर्यंत दररोज मध्यरात्री १२.३० ते १.०० वाजेपर्यंत अर्ध्या तासासाठी चांदणी चौक (Chandani Chowk) येथील सर्व बाजूची वाहतूक बंद राहणार आहे. वाहतुकीच्या बदलाची वाहनचालक, प्रवासी तसेच नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) चे प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी केले आहे.
हे सुद्धा वाचा –
पूलाच्या कामासाठी खडक फोडण्याचे काम
चांदणी चौकातील वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी हा पूल पाडण्याचा निर्णय सरकारने घेतला. २ ऑक्टोबर रोजी रात्री उशीरा ६०० किलो स्फोटकांच्या सहाय्याने हा पूल पाडण्यात आला. हा पूल पाडल्यानंतर तातडीने या नवीन पूल बांधण्याचे काम सुरू करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. दरम्यान आता या पूलाचे काम सुरू करण्यात आले असून सध्या पूलाच्या कामासाठी खडक फोडण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे आज मध्यरात्री १२ ते १.०० वाजेदरम्यान येथे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना याबाबतच्या सूचना एनएचएआयने केल्या आहे.