आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत
टीम लय भारी
अहमदनगर : राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत आता नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले आहेत.
राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राज्यात रेल्वे देखील सुरु करण्यात आली आहे. अशातच आता नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याचे संकेत राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले आहेत. सर्वसामान्यांना लवकरचं लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. तसेच दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालय सुरु करण्याचा विचार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी राजेश टोपे अहमदनगरमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात मागील काही दिवसांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. राज्यात शनिवारी २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी झाले, तर आतापर्यंत १२ लाख ५५ हजार ७७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अनलॉक 5 अंतर्गत राज्यातील सुमारे चार लाख रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार पुन्हा सुरु झाले आहेत. त्यामुळे राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करूया, असं विधान राजेश टोपे यांनी केले आहे. राजेश टोपे यांच्या या विधानातून लॉकडाऊनला जवळपास पूर्णविराम मिळू शकतो, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.