टीम लय भारी
मुंबई :– अधिवेशनाच्या सुरूवातीपासून ते आतापर्यंतच्या सर्व घडामोडी आणि सरकारवरील आरोपांची मालिका बघात नेमके काय होते, आणि कशासाठी होत आहे आणि कोण करत आहे याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल, असेल असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात सत्ता आणण्यासाठी भाजपची धडपड सुरू असल्याचे रोहित पवार यांनी या ट्विटमधून म्हटले आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल. pic.twitter.com/8r9KT1jzou
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 22, 2021
रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी घडलेल्या गोष्टींबाबतचे निरीक्षणही नोंदवले आहे. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतची माहिती मीडियाला दिली. परंतु, त्याचवेळी पवारांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारण्यात आले. पुरावा म्हणून देशमुखांचा व्हिडीओ ही दाखवण्यात आला. पत्रकारांकडे हे सर्व मुद्दे आले कुठून?, त्यांना कोण माहिती पुरवत होते? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पवारांची पीसी सुरू होताच भाजपचे सर्व नेते सोशल मीडियावर सक्रिय झाले होते. पवारांच्या मुद्द्यांवर सोशल मीडियातून प्रतिक्रिया देत होते. तसेच बरीच माहितीही पुरवत होते. यामागे भाजपचा मोठा प्लान दिसतोय, असे रोहित पवार म्हणाले.
सरकार पाच वर्षे टिकणार
विरोधकांकडून सातत्याने खोटी माहिती देऊन संभ्रम निर्माण केला जात आहे. केंद्र सरकारकडे अनेक प्रश्न पडले आहेत. त्यावर कोणी बोलताना दिसत नाही. परंतु असे काही विषय आल्यावर हे लोक बोलायला लागतात. याचे वाईट वाटते, असे सांगतानाच सुशांत सिंग प्रकरणात देखील विरोधकांनी राजकारण केले. आता देखील दोन महिने हे प्रकरण तापवतील. त्यानंतर सत्य बाहेर येईल, असे त्यांनी सांगितले. सरकारच्या अडचणी खरोखरच वाढल्या आहेत की, विरोधक तसा भास निर्माण करत आहेत, हे समजून घेतले पाहिजे. पण विरोधकांनी कितीही काहीही केले तरी हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा दावाही त्यांनी केला.
राजकीय ताकद मिळाली का?
मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी पत्रात ज्या गोष्टी नमूद केल्या आहेत, त्यातील तारखांचा मेळ लागत नाही. पदावर असताना त्या अधिकाऱ्याने कोणाला काहीच सांगितले नाही. पद गेल्यावरच इतक्या आत्मविश्वासाने हा विषय मांडला. त्यामुळे त्यांना राजकीय ताकद मिळाली की, काय असा संशय लोकांमध्ये निर्माण झाला आहे. यात मोठ्या प्रमाणात राजकारण केले जात आहे. तसेच या गोष्टीमुळे राजकीय युती होते की काय? असा संशय घेण्यासही वाव आहे, असे ही रोहित पवार म्हणाले.