टीम लय भारी
मुंबई :– महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठी काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मुंबईतील रूग्ण मृत्यूदराचा दर कमी झाला असला तरी रूग्णवाढीचा वेग मात्र जास्त आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने होळी आणि धुलिवंदन साजरा करण्यासाठीची नियमावली जारी केली आहे. यानुसार सार्वजनिकरित्या होळी सण साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी
मुंबईत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून होळी आणि धूलिवंदन/ रंगपंचमी हा उत्सव खासगी किंवा सार्वजनिक जागेत साजरा करण्यात मनाई करण्यात येत आहे. तसेच मी जबाबदार या मोहिमेतंर्गत वैयक्तिरित्याही हा सण साजरा करणे टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच जो कोणी या नियमांचे पालन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहे.
व्यापारांचे नुकसान होण्याची शक्यता
त्यामुळे यंदाही कोरोनापूर्वी साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळीवर निर्बंध येणार आहे. याचा फटका व्यावसायिकांना बसण्याची शक्यता आहे. या निर्बंधामुळे अनेक दुकानात शुकशुकाट पहायला मिळत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील कोरोना स्थिती
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्येत काल पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळत आहे. मुंबईत काल दिवसभरात ३ हजार ५१२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार २०३ रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत काल दिवसभरात ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी ६ जणांना काही दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये ५ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता खालावला आहे. १०० दिवसांच्या पुढे असणारा हा कालावधी आता ९० दिवसांवर आला आहे.
महाराष्ट्रातील कोरोना स्थिती
राज्यात बुधवारी दिवसभरात २८ हजार ६९९ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर १३ हजार १६५ जण कोरोनामुक्त झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपेक्षा आज मृतांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. बुधवारी दिवसभरात १३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या २ लाख ३० हजार ६४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २५ लाख ३३ हजार २६ वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील २२ लाख ४७ हजार ४९५ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ५३ हजार ५८९ जणांचा मृत्यू झाला आहे.