लय भारी टीम
मुंबई : विधान परिषद (MLC election) निवडणुकीसाठी शेकडो तगडे स्पर्धक असतानाही काँग्रेसमध्ये राजेश राठोड (Rajesh Rathod) यांनी कसा नंबर लावला, हे कोडे सगळ्यांना पडले होते.
विधान परिषदेच्या एका जागेसाठी पक्षातले १२३ जण इच्छुक होते. यात माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, हरिभाऊ राठोड, मोहन जोशी, डॉ. आशिष देशमुख, रजनी पाटील, हर्षवर्धन सपकाळ, प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत अशा अनेक मातब्बर नेत्यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे फिल्डींग लावली होती.
परिषदेची निवडणूक एप्रिलच्या महिना अखेरीला गृहीत धरून पक्षाने इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल १२३ कार्यकर्त्यांनी पक्षाकडे परिषदेवर संधी मिळावी, अशी विनंती केली होती.
काँग्रेसकडून अनेक जणांची नावे चर्चेत होती. यात प्रामुख्याने सचिन सावंत, माजी मंत्री डी. पी. सावंत, पुण्याचे मोहन जोशी आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे सुद्धा इच्छुक होते. परंतु या सगळ्यांना डावलून राजेश राठोड यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली.
चव्हाण गटाने प्रवक्ते सचिन सावंत आणि माजी मंत्री डी. पी. सावंत यांची नावे पुढे केली होती. तर थोरात गटाकडून पुण्याचे मोहन जोशी यांचे नाव पुढे केले होते.
पण राठोड यांना थेट खासदार राजीव सातव यांच्याशी असणारी जवळीक यावेळी कामी आली. राजीव सातव यांनी राठोड यांचे नाव सर्वात पुढे सरकवले होते. काँग्रेसमध्ये कुरघोडी नेहमीच चालू असते. कुरघोडी केल्यामुळे फूट पडते. राठोड कधीच अशा प्रकरणात सहभागी नव्हते. त्यामुळे सर्वांशी मिळून घेण्याचा स्वभाव त्यांना कामी आला आहे.
ही ५ कारणे ठरली राठोड यांच्यासाठी महत्वाची…
१) राजेश राठोड स्वतः व त्यांचे घर काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. राज्याच्या फुटीर राजकारणात/ नेत्यांसोबत त्यांनी कधीच सहभाग घेतला नाही.
२) मागच्या विधानसभेच्या वेळी त्यांना तिकीट न देऊन त्यांच्यावर अन्याय झाला होता. ती चूक यावेळी सुधारण्यात आली.
३) युवक काँग्रेसमध्ये त्यांनी भरीव काम केले आहे. राजेश राठोड हे काँग्रेसमधील युवा नेते आहेत. ते जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. एनएसयूआयपासूनच ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव म्हणूनही ते संघटनेत काम करत आहेत.
४) सध्या ते राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आहेत.
५) काँग्रेसलाही बंजारा समाजाला संधी दिल्याचे सांगता येईल.