लयभारी टीम
मुंबई : मनसे आणि भाजप युती करणार असल्याची चर्चा सुरु असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपला डिवचले आहे. राज ठाकरे म्हणाले, सध्या भारतात मोडी लिपी नाही तर फक्त मोदी लिपी दिसते.
मुंबईमध्ये आज मंगळवार (२१ जानेवारी ) रोजी राज ठाकरे यांच्या हस्ते अच्युत पालव यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी सुलेखनकार अच्युत पालव यांची स्तुती केली. अच्युत पालव यांनी सुलेखनासाठी केलेलं काम अफाट आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमात त्यांनी सुलेखन, अक्षर चांगलं असणं आणि मोडी लिपी याबाबत भाष्य केलं.
२६ जुलैचा जो पाऊस मुंबईत झाला होता त्यावेळी त्यांचं अनेक साहित्य भिजलं. मात्र त्यांनी सुलेखनासाठीची मेहनत सुरुच ठेवली असंही राज ठाकरे यांनी म्हटलं. माझं अक्षर चांगलं आहे याचं महत्त्वाचं कारण आहे बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील. अक्षर चांगलं असलं की मनालाही समाधान वाटतं, असंही राज ठाकरे म्हणाले.