लय भारी न्यूज नेटवर्क
सातारा : प्रभाकर देशमुख यांच्या मागे सगळे पक्ष आहेत की नाहीत, या प्रचाराला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी देशमुख यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे. वडूज येथे ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
या पत्रकार परिषदेत माजी आमदार दिलीप येळगावकर (भाजप), अनिल देसाई (भाजप), रणजित देशमुख (शिवसेना), माजी आमदार प्रभाकर घार्गे (राष्ट्रवादी), अनिल पवार (स्वाभिमानी शेतकरी संघटना), मामुशेठ विरकर (राष्ट्रीय समाज पक्ष), संदीप पोळ (राष्ट्रवादी काँग्रेस), संदिप मांडवे, सुरेंद्र गुंडगे, अशोक गोडसे, दिलीप तुपे, सत्यवान कमाने आदी पदाधिकारी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
माण – खटाव तालुक्यात परिवर्तन झाले पाहिजे. गुंडगिरी संपुष्टात आली पाहीजे. मतदारसंघातील गुन्हेगारी कमी होऊन सर्वांगीण विकास झाला पाहिजे. उडाणटप्पू लोकांऐवजी सभ्य माणसे राजकारणात टिकली पाहीजेत. विचारवंत, अभ्यासू, अधिकारी, पत्रकार यांच्यावरील दहशत कमी झाली पाहिजे. माण – खटाव मतदारसंघातील लोकप्रतिनिधीच्या दहशतीला आवर घालायची असेल तर त्यांचा पराभव होणे गरजेचे आहे. प्रभाकर देशमुख अत्यंत सभ्य, मनमिळावू, हुशार, दुरदृष्टी असलेली व्यक्ती आहे. त्यामुळे देशमुख यांना आम्ही पाठींबा देत आहोत, अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.
प्रभाकर देशमुख हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. राज्य सरकारची जलयुक्त शिवार योजनेचे ते प्रणेते आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे माण – खटाव तालुक्यातील जनतेमध्ये सहानुभूतीची लाट उसळली आहे. सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्तेही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. सामान्य लोकांनी त्यांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. अशातच आता त्यांना ‘आमचं ठरलंय’ या मोहिमेअंतर्गत सगळ्या पक्षांनी पाठींबा जाहीर केला आहे.
विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्या काळात माण – खटावमध्ये गुन्हेगारी वाढली. विकास फारसा झाला नाही. विशेष म्हणजे, सुसंस्कृत विदवान, अधिकारी, पत्रकार यांच्यात त्यांनी मोठी दहशत निर्माण केली. गावागावांत त्यांनी टवाळखोर कार्यकर्त्यांची फौज तयार केली. हे कार्यकर्ते सभ्य लोकांवर शिरजोर होऊ लागले. आमदाराच्या विरोधात कोणी बोलू लागला तर त्याचे तोंड दाबण्याचे प्रकार होऊ लागले. इतरांना तुच्छ लेखणे, ताटाखालचे मांजर बनविण्यास भाग पाडणे, गुर्मीत बोलणे असे यथेच्छ दुर्गण आमदार गोरे यांच्यामध्ये ठासून भरले आहेत. सामाजिक काम करणाऱ्यांना तर नकोसे करून सोडतात. कुणीही सभ्य माणूस गोरे यांच्यासमोर जात नाही. गावांवरून ओवाळून टाकलेल्या टवाळखोरांचे नेतृत्व गोरे करतात. अशी भावना या पत्रकार परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केली. त्यामुळे गोरे यांच्या विरोधात संतापाची लाट आहे. परिणामी गोरे यांना ही निवडणूक चांगलीच अडचणीची ठरणार असे दिसू लागले आहे.
[box type=”shadow” align=”aligncenter” class=”” width=””]नो पेड न्यूज’ : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपल्या हिताच्या बातम्या छापून याव्यात म्हणून अनेक उमेदवार प्रसारमाध्यमांना लालूच दाखवतात. त्या पार्श्वभूमीवर ‘लय भारी’ या न्यूज पोर्टलने ‘नो पेड न्यूज’ ही सुस्पष्ट भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ‘लय भारी’ पोर्टलसाठी कुणीही लालूच दाखविण्याचा प्रयत्न करू नये. वस्तुनिष्ठ, सत्य व भारतीय राज्य घटनेच्या तत्वांना अनुसरूनच आम्ही पत्रकारिता करतो, हे अभिमानाने नमूद करीत आहोत. – संपादक[/box]