काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी झारखंडचे माजी मंत्री के. एन. त्रिपाठी यांचा उमेदवारी अर्ज शनिवारी फेटाळण्यात आला. त्यामुळे आता काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्या मध्ये लढत होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, शनिवारी अध्यक्षपदाच्या अर्जाच्या छाननीसाठी पॅनेलची बैठक झाली. उमेदवारी प्रक्रियेदरम्यान एकूण 20 अर्ज प्राप्त झाले. त्यातील चार अर्ज सह्या वारंवार झाल्यामुळे किंवा जुळत नसल्याने नामंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. खरगे यांनी एकूण चौदा, थरूर यांनी पाच आणि त्रिपाठी यांनी एक अर्ज सादर केला होता.
मिस्त्री पुढे म्हणाले की, खर्गे आणि थरूर या दोन उमेदवारांमध्ये आता थेट लढत आहेत. झारखंडमधील दुसर्या उमेदवाराचा एक अर्ज नाकारण्यात आला आहे. 8 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी सात दिवसांची मुदत आहे. त्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
त्रिपाठी यांचा फॉर्म नाकारण्यात आला कारण त्यांच्या एका प्रस्तावकाची स्वाक्षरी जुळत नाही आणि दुसर्या प्रस्तावकाची स्वाक्षरी पुनरावृत्ती झाली. खर्गे आणि थरूर यापैकी कोणीही माघार न घेतल्यास अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी मतदान होईल असेही मिस्त्री यांनी स्पष्ट केले.
हे सुद्धा वाचा –
Devendra Fadnavis: गडचिरोली पोलिसांचे वेतन दोन दिवसांमध्ये वाढणार – पालकमंत्री देवेंद्र फडणवीस
5G Services Launch: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G सेवेचा दिल्लीत शुभारंभ
काँग्रेस पक्षाच्या मुख्य निवडणूक प्राधिकरणाने जारी केलेल्या वैध नामनिर्देशनांची यादी सामायिक करताना, थरूर यांनी ट्विट केले की, हे जाणून आनंद झाला की श्री खरगे आणि माझ्यामध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. या लोकशाही प्रक्रियेचा पक्षाला आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना फायदा होवो!
काँग्रेस पक्षाने गुरुवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 ते 30 सप्टेंबर या कालावधीत होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर असून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. गरज भासल्यास मतदान 17 ऑक्टोबरला होणार आहे. मतमोजणी 19 ऑक्टोबर रोजी होईल आणि त्याच दिवशी निकाल घोषित केले जातील. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये 9,000 हून अधिक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (PCC) प्रतिनिधी मतदान करणार आहेत.