31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeराजकीय‘खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे'; जितेंद्र आव्हाडांनी उडवली खिल्ली

‘खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’; जितेंद्र आव्हाडांनी उडवली खिल्ली

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन लागू केले. १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात आला. परंतु, त्यावर भाजपने टीका करायला सुरुवात केली आहे. भाजपने लॉकडाऊनच्या निर्णयावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजपच्या या टीकेला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट कवितेतून टीका केली आहे. ‘खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’, असे शिर्षक असलेल्या या कवितेतून जितेंद्र आव्हाडांनी भाजपची फिरकी घेतली आहे. त्यांनी फेसबुकवर ही कविता पोस्ट केली आहे.

खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!
कधी थाळ्या वाजवायला
लावल्या नाही…
ना कधी मेणबत्या आणि दिवे
लावायला लावले …..
निर्णय घेताना घेतले
विश्वासात…..
विरोधकांचे त्यामुळेच
फावले…….
शांत राहून तो लढत आहे
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

मंदिर उघडा, बाजार उघडा
शाळा उघडा ते म्हणाले…..
परीक्षा पुढे ढकलल्या तर
ते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले….
कोरोना वाढला तर ते आता
फक्त सरकारला दोषी ठरवत आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

इमान तर विकले नाहीच
ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या…..
कोरोनाचे आकडे लपवले नाहीच
खोट्याने न कधी माना झुकल्या….
घरी पत्नी आणि मुलगा
आजारी असतांना तो मात्र लढत आहे….
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

ना कुठे बडबोलेपणा
ना कशाचा बडेजाव..
आठ हजार कोटीचे
विमान नको….
ना कोणत्या प्रकरणात
घुमजाव……
जे करतोय ते प्रामाणिकपणे
तो करतो आहे…..
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

व्यापाऱ्यांचे ऐकून घेतोय…
विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय….
गोरगरीब जनतेला
एकवेळ शिवभोजन मोफत देतोय….
निसर्ग चक्रीवादळ, कोरोना संकट
शेतकऱ्यांच्या अडचणी
साठी तो शांततेत लढतो आहे ……
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…..!!

ना क्लीन चिट देता आली…
ना खोटी आकडे वारी देता आली…
निवडणूक काळात तर कधी
ना अशक्य घोषणा त्याला करता आली…
जे होण्यासारखे आहे तेच तो करतोय…
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

महाराष्ट्राचे मीठ खाऊन
निधी पंतप्रधान निधीला ते देताय…
उठसूठ, सकाळ संध्याकाळ
ते टीका सरकार वर करताय…..
तो मात्र टिकेला उत्तर न देता
सर्वसामान्यांसाठी झटत आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

डॉ.जितेंद्र आव्हाड

केंद्र सरकार, महाराष्ट्र भाजपची उडवली खिल्ली

जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक शैलीत ही कविता लिहिली असून त्यातून त्यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळ्या, थाळ्या वाजवण्यास, मेणबत्या, दिवे पेटवण्यास सांगितले नाही. ते शांतपणे लढत आहेत. विरोधक मात्र कोरोना संकटातही मंदिर उघडा, बाजार उघडा असे सांगून रस्त्यावर उतरले होते, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचे निमित्त साधून सरकारी कंपन्या विकल्या नाहीत आणि कोरोनाचे आकडेही लपवले नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. कोणताही निर्णय घेताना मुख्यमंत्री सर्वांशी संवाद साधत आहेत. व्यापाऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचे ऐकून घेऊनच निर्णय घेत आहेत. मग हा मुख्यमंत्री खरंच वाईट आहे का? असा सवालच आव्हाड यांनी केला आहे. यावेळी महाराष्ट्राऐवजी पंतप्रधान निधीला निधी देणाऱ्या महाराष्ट्र भाजपवरही त्यांनी खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्री सर्वसामान्यांसाठी झटत असल्याचे त्यांनी कवितेच्या शेवटी सांगत भाजपच्या सर्व आरोपांची खिल्ली उडवली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी