29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंच्या पत्रानंतर केंद्राकडून हाफकिन्सला लसीची परवानगी; मनसेचा सरकारला टोला

राज ठाकरेंच्या पत्रानंतर केंद्राकडून हाफकिन्सला लसीची परवानगी; मनसेचा सरकारला टोला

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात कोरोना लसीचा तुटवडा देखील निर्माण झाला आहे. हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा देण्याबाबत  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्यानंतर काही तासातच त्यासंबंधी मान्यता मिळाली. याला “ठाकरे ब्रँड” म्हणतात, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सरकारला टोला लगावला.

“राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिन्सला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पण त्याची परवानगी राज ठाकरेंचे पत्र गेल्यावर आली. याला म्हणतात “ठाकरे ब्रँड”. कोरोना काळात “राजकारण” नको म्हणणाऱ्यांनी आभार मानायला हरकत नव्हती.” असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

केंद्र सरकारकडून मुंबईच्या हाफकिन संस्थेत लसनिर्मितीस परवानगी

केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे. हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु केले जाणार आहे. मात्र त्यापूर्वी राजकीय वर्तुळात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

केंद्राच्या या परवानगीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरेंनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

राज ठाकरेंचे ट्वीट

१०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असेच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की, असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे.

राज ठाकरेंची पत्राद्वारे मागणी 

राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा यामुळे राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रे लिहिले होत. यात त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह पाच मागण्या केल्या होत्या. यात लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी केली होती. तसेच कोविड रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, असे राज ठाकरेंनी नमूद केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी