31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयफडणवीसांना अटक म्हणजे अटक मटक चवळी चटक आहे का? वाघांचा टोला...

फडणवीसांना अटक म्हणजे अटक मटक चवळी चटक आहे का? वाघांचा टोला…

टीम लय भारी

मुंबई  :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमात वाढत आहे. राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा मोठया प्रमाणात निर्माण झाला आहे. रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून राज्यात विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी यांच्यात राजकीय वादळ रंगले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप करत फडणवीसांना अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. त्यावरुन आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी चाकणकरांची जोरदार खिल्ली उडवली आहे. फडणवीसांना अटक करणे म्हणजे अटक मटक चवळी चटक वाटले की काय? असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

“उठले की निघाले आरोप करायला आता काय तर म्हणे देवेंद्र फडणवीस यांना अटक करा. अटक मटक चवळी चटक वाटले की काय? रेमडेसिव्हीर राज्यसरकारलाचे देणार होते. संबंधीत मंत्र्यांशी CS साहेबांशी बोलणे झालेले. माहिती तर घ्यायची आधी. सरकार म्हणते सहकार्य करा. आम्ही करत आहोत आणि करणारचे पण या बावळटांना आवरा रे” असे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या मागणीची खिल्ली उडवली आहे.

गृहमंत्री वळसे-पाटलांनाही आव्हान

दरम्यान, पोलिसांवर दबाव टाकणे सहन केले जाणार नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले होते. एकप्रकारे त्यांनी भाजप नेत्यांना इशाराच दिला आहे. त्यावरुनही चित्रा वाघ यांनी गृहमंत्र्यांना आव्हान दिले. “गृहमंत्री जी ब्रूक फार्मा कंपनीच्या संचालकांना कुठल्या मंत्र्याच्या OSD ने फोन करून धमकावले तो मंत्री कोण? त्याने का आणि कुणाच्या सांगण्यावरून धमकावले?, ह्याची ही माहिती पोलिसांनी आपल्याला दिलीचे असेल, ते ही सांगा महाराष्ट्राच्या जनतेला”, असे ट्वीट वाघ यांनी केले आहे.

फडणवीसांना अटक करा – चाकणकर

रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा केल्याचा संशय असलेल्या ब्रूक फार्माच्या मालकाच्या पोलीस चौकशीवर आक्षेप घेणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कामात अडथळा आणून त्रास दिला, असा आरोप चाकणकर यांनी केला. त्या सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अटक करा, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली. त्यामुळे आता गृहमंत्री यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी